Sunday, February 19, 2012

होय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माला आले



सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा एक क्रांतीसूर्य ज्याने स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा प्रकाश या मातीच्या प्रत्येक घरा- घरा पर्यंत पोचवला, गुलामगिरीचा अंधकार नष्ट करून सामान्य कष्टकर्यांच्या हातून स्वराज्य निर्माण केले. या महाराष्ट्राचा अभिमान, अस्मिता आणि ओळख म्हणजेच स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज.
जगाच्या पाठीवर आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि प्रचंड पराक्रमाच्या जोरावर ज्यांनी आपला ठसा उमटवला, क्षणाचीही उसंत न घेता उभं आयुष्य सामान्य रयतेसाठी खर्ची घालणारा, स्वराज्यातील प्रत्येकाच्या पोटात अन्न पडल्यावरच दोन घास खाणारा, सामान्यातल्या असामान्य शक्तीला ओळखून त्या शक्तीला जागं करणारा आणि त्या शक्तीचा स्वराज्य निर्मिती च्या कार्यात उपयोग करून घेणारा असा आमचा जाणता राजा.
जगाच्या इतिहासातील असे सोनेरी पान जिथून पुढे एक नवा अजरामर इतिहास निर्माण झाला, जो आजही लाखो करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो, घरा-घरांमध्ये प्रेरणास्तंभ म्हणून आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. इथली माती आजही गर्वाने सांगते - "होय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माला आले!" आजही शिवरायांचे नाव घेताच आमचा उर भरून येतो. जय भवानी - जय शिवाजी ची आरोळी ऐकली तरी आमचे रक्त सळसळते, मनगटा मध्ये एक बळ प्राप्त होते आणि आयुष्या मध्ये काही तरी करून दाखवण्याची, काही तरी घडवण्याची प्रचंड उर्जा निर्माण होते. अशा शिव छत्रपतीचा याच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर जन्म झाला. या शिव जयंतीच्या तुम्हाला जिजाऊ.कॉम तर्फे खूप खूप शुभेच्छा.
शिवाजी महाराजांसारखा दीपस्थंभ या राष्ट्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि प्रकाश देत आलेला आहे. तोच प्रकाश आणि प्रेरणा तुम्हाला, आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांना ही नक्की पुरेल इतका अजून प्रखर आहे. जग किती ही बदलत असले तरी या न त्या प्रकारे शिवराय हे व्यक्तीमत्व अनेकांना अनेक क्षेत्रात प्रेरक ठरतच आहे. मग ती सामाजिक, राजकीय वा मग औद्योगिक चळवळ का असेना. एकीकडे जागतिकीकरणात बदलणारा समाज इतिहासाबद्दल उदासीन होत असतांना दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या नावावर खूप मोठा तरुण वर्ग संघटीतही होत आहे. प्रश्न पडतो - असं का? किंवा मग हे दोन वेग वेगळे वर्ग का? एकीकडे 'उदासीनता' तर दुसरीकडे प्रचंड 'श्रद्धा'. आणि उदासीन वर्ग या श्रद्धाळू वर्गाकडे अशा रीतीने बघतो जस काय हे सगळे श्रद्धाळू प्रतीगामीच. कुठे तरी चुकतंय. प्रत्येक गोष्टीच उपयोग मूल्य काढण्याची सवय लागलेला समाज महापुरुषांच्या बाबतीतही 'यांची उपयोगिता काय?' हा प्रश्न करते. प्रश्न करणे अतिशय योग्य. पण उत्तरासाठी प्रयत्नाबद्दलही उदासीनता. असो.
नवा समाज निर्माण होत असतांना जो की आपल्याकडे आता फार गतीने होतोय. म्हणजे खेड्यांची शहरे होत असतांना आणि शहरांची महानगरे होत असतांना समाजाच नव-निर्माण होत असत. मूल्य बदलतात, संस्कृती बदलतात. अर्थार्जनाचे मार्ग बदलतात. काही प्रश्न सुटतात आणि अनेक नवे निर्माण होतात. आणि इथेच या नव्या प्रश्नांच्या उत्तरासाठी गरज असते ती तुमच्या ऐतिहासिक महापुरुषांची. त्यांच्या जीवनातून आणि कार्यातून आपोआप उत्तरे मिळत असतात. त्या उत्तरांच एक्झिक्युशन म्हणजे पुन्हा नव्या समाजाची निर्मिती. पण यासाठी मूलतः तो महापुरुष आपण शिकायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. आणि ही जबादारी प्रत्येक वेळी मुख्यतः समाजातील तरुण वर्गाची असते. ती आपण सर्वांनी या जयंतीच्या माध्यमातून पार पाडायला हवी. आणि काही अंशी महाराष्ट्रीय तरुण ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडतही आहे.
प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्यात शिवरायांच्या चरित्राने खूप योग्य आणि अर्थ पूर्ण अशी दिशा मिळू शकते. शिवाजी महाराजांनी एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि आदर्श पिता म्हणून स्वतःला सिद्ध तर केलंच पण अवघ्या मुलुखाच पालकत्वही त्यांनी स्वीकारलं. रंजल्या गांजल्या जनतेच्या पाठीशी एक खंबीर आधार म्हणून उभे राहिले. ज्याचं जीवन म्हणजेच एक संघर्ष, पण या संघर्षातूनही त्यांनी एक असामान्य-अभूतपूर्व कार्य हाती घेतलं आणि प्रत्येकाला आपल वाटावं अस स्वराज्य निर्माण केल. आज आम्ही काय करतोय? एकविसाव्या शतकातील अतिशय वेगाने पुढे जाणारी आमची पिढी, आपल्या अमर्याद वेगाने धावतेय आणि फक्त धावतेय. या धावण्याला दिशा नाहीये. आज जीवनाचा अर्थ केवळ आणि केवळ "अर्थ" प्राप्तीतच उरला आहे असा समज वरचेवर वाढतच आहे. स्पर्धेच्या या जगात आपल्या आयुष्यातील सर्व काळ, सर्व क्षण हे आपण केवळ कुठलातरी संघर्ष करण्यातच घालवतो. म्हणजे अग्रेसिव्ह नव्हे तर डिफेन्सिव्ह खेळण्यात घालवतो. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर संघर्ष हा अटळच. तो कुणीही नाकारूच शकत नाही. पण या संघर्षातून काहीच बाहेर पडत नसेल तर याला जगण्याची धडपड असेच म्हणतात; होय, 'केवळ जगण्याची धडपड'!आजकाल कुणाच्या ही आयुष्याकडे बघा. अख्ख आयुष्य फक्त धडपड करून शेवटी काय उरते? आणि काय देऊन जाता दुसऱ्याला? हेच लोक मोजतात. मग काय देऊन जाणार आपण येणाऱ्या पिढीला?.... स्वतःला चार भिंतींच्या आत कोंडून ठेवणारे आम्ही येणाऱ्या पिढीला त्याच 'चार भिंतीं शिवाय' काय देऊ शकणार? हाच का आपला वारसा, हाच का आपला इतिहास येणाऱ्या पिढ्यांसाठी 'चार भिंतींचा'? नाही. नक्कीच नाही.
वर्षानुवर्षे आमचा अखंड प्रेरणा स्त्रोत असणारे शिवराय हेच आम्हाला शिकवून जातात. त्यांनी ही आयुष्यभर संघर्ष केला. उभं आयुष्य फक्त घोड दौड. कधी विश्रांती नाही किंवा कधी कुठलाही राज विलास नाही. आयुष्यात होता फक्त संघर्ष. पण या संघर्षातूनही त्यांनी खूप काही घडवलं. जीवाला जीव देणारे मित्र कमावले. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी प्रंसगी मृत्यूलाही सामोरे जाणारे मावळे घडवले. शेकडो वर्षांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करून सामान्य माणसाच्या खांद्यावर स्वराज्याची पताका दिली. आज ताठ मानेने आपण जे घराबाहेर पडतो ते त्या युग पुरुषामुळेच. तीनशे वर्ष झाली शिवराय आजही तुमच्या आमच्या मनामध्ये कायम आहेत आणि त्यांचे विचार हजारो वर्षे या मातीमध्ये कायम राहतील, हीच त्यांची कमाई. कदाचित असच काहीतरी आपल्या प्रत्येकाकडून या समाजाला अपेक्षित आहे.
आपल्याच सोनेरी इतिहासाला, संस्कृतीला जपणारे आजच्या काळात मागासलेले ठरवले जाऊ लागले आहेत. पाच्छिमात्य देशांची आणि त्यांच्या महापुरुषांची जवळीक बाळगणारे आधुनिक ठरवले जातात. इथे कुठल्याही प्रकारे कुठल्याही परकीय महापुरुषांचे महत्व कमी करण्याचा हेतू नाहीये, पण आज आमच्या घरांमधून आमच्याच महापुरुषांच्या छायाचित्रांची, पुस्तकांची जागा आज कशाने व्यापली आहे हे आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. प्रचंड विरोधाभास असणारी ही परिस्थिती अधिक बिकट बनत चालली आहे, शिवरायांना मनापासून मानणाऱ्या सर्वांवर ही एक फार मोठी जबाबदारी आहे.
नव्या समाजाला अनेक प्रश्न पडत आहेत आणि त्या प्रश्नांना आता भौगोलिक आणि राजकीय सीमा ही राहिल्या नाहीत. आणि आश्चर्य हे की आपल्याकडे जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरे, होय नवे जरी असले तरी, शिव चरित्रात सापडतात, हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शिवाजी महाराज या दीपस्थंभा समोर उभे राहा नक्कीच प्रकाशून निघाल.
येणाऱ्या काळाची संकटे ओळखून आपल्या इतिहासातील सर्वच महापुरुषांच्या चरित्राचे पुन्हा पारायण करायची वेळ आली आहे. आणि शिवाजी महाराजा हे त्यात अग्रणी हवेत. समस्त शिव भक्तांनी मिळून उचलाव असं हे फार मोठ्ठ शिवधनुष्य आहे.
पुन्हा एकदा सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!



जय शिवराय!
आपलेच
कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम
www.jijau.com

No comments:

Post a Comment