Monday, April 22, 2024

परिवर्तन हा जगाचा नियम ! परंतु ते आपोआप घडत नसते.


 नेहमीप्रमणेच रविवारची संध्याकाळ कुटुंबासोबत उन्हाळी सुट्टी, लग्न, कार्यक्रम म्हणून शॉपिंग साठी मार्केट ल गेलेलो, मी आज काल मॉल पेक्षा लोकल मार्केट prefer करतो कारण मॉल च तोच तोच पणा आणि चमक धमक या ही पेक्षा लोकल मार्केट ल तुम्हाला अनेक डिझाईन आणि creativity बघायला मिळते, मुख्य म्हणजे तेथील अर्थकारण लक्षात येते.

बाजारात फिरत असताना असेच कानावर एकदम खड्या आवाजातील गाण्यांचे बोल कानी पडले, आवाजाच्या दिशेने गेल्यास नजरेस पडले की शहराच्या मधोमध एका शाळेच्या मैदानात शिव - भीम गीतांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला, सादरकर्ते आपल्या प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आणि त्यांचा संपूर्ण समूह. थोडं जवळ गेल्यास  "विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत " हे गाणे कानावर पडले, अगदी तोच पहाडी आवाज आणि तीच भक्तिमय साद. राहवले नाही म्हणून मुलांना घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो.. म्हणलं आज मुलांना दाखवतो संगीतातील "जलसा" हा प्रकार काय असतो ते. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्याक्षणी "दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर, एक त्या रायगडावर.. एक चवदार तळ्यावर ... DJ ची साथ.. कडक आवाज, आणि समोर नाचणारे लोक हे डोळ्यासमोर आले, एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं, खरंच बघून खूप कौतुक वाटले .. ते मुलांना दाखवले आणि सांगितले हाच तो समाज आहे ज्यांना 70 एक वर्षापूर्वी गावकुसाबाहेर ठरलेली जागा असायची, आणि गावात अनेक ठिकाणी प्रवेश निषिद्ध होता. मुलगी म्हणाली असे कसे शक्य आहे.. तिला समजावणे कठीण पण हे सत्य होते सांगितले आणि पुढे हे ही सांगितले की यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक मॅजिक मंत्र जीवनात अंमलात आणला म्हणून गावगाड्याच्या बाहेर पडलेला हा समाज आज शहराच्या केंद्रस्थानी आपला जल्लोष सह कुटुंब साजरा करत आहे, आणि एव्हढा मोठा प्रचंड सामाजिक बदल ते ही फक्त गेल्या काही वर्षात. मुलीने कुतूहलाने विचारलं .. मॅजिक मंत्र ? तो कुठला ? जवळच असलेला एक बॅनर तिला दाखवला, त्यावर ठळकपणे लिहिलेले होते .. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ! तिला बोललो हा मंत्र या समाजाने अगदी मनापासून जीवनात आत्मसात केला.. हजारो वर्षे वाळीत टाकलेली ही लोक शिकली, पुढे संघटित ही झाली आणि आज त्याच जोशाने आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष देखील करतात. खरं तर हा मूलमंत्र बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांना दिला होता.. कदाचित सर्व समाजातील मंडळींनी हा मॅजिक मंत्र आपल्या आयुष्यात अंगिकारला आता तर आज आपला देश ही जगाच्या केंद्रस्थानी राहिला असता. विदेशात जाऊन निव्वळ पैसा कमावणाऱ्या लोकांपेक्षा खऱ्या अर्थाने आपल्या देशाने, म्हणजेच देशातील लोकांनी जगाचे नेतृत्व केले असते. तेंव्हाच हा देश विश्वगुरू म्हणून खऱ्या अर्थाने ओळखला गेला असता. डॉ. बाबासाहेब, छत्रपती शिवराय, महात्मा फुले आणि असे अनेक.. हे आपले सौभाग्य म्हणून या मातीत जन्माला आले परंतु आपण त्यांना एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवले.. निदान येणाऱ्या पिढीने ही चौकट तोडून या महापुरुषांचे विचार अंगीकारले तर आपला देश नक्कीच एक दिवस जगात एक नंबर होईल.. मुलांचे चमकणारे डोळे बघून पुन्हा एकदा आशेचा एक नवा किरण दिसला, थोडा वेळ थांबून मुलांचे हात धरून परतीची वाट धरली, वाटलं यांना या लेखिनीची किंमत आणि ताकद नक्कीच समजली असेल. 

एकंदरीत मुलांना सांगताना आपल्याच विचारांची झालेली उजळणी एक छान अनुभव देऊन गेली.  सोशल मीडिया आणि virtual दूनियेतून baher पडून मोकळ्या हवेत फिरण्याचे अनेक फायद्यांपैकी हा ही एक छान फायदा, समाजाशी आणि आपल्या सामाजिक विचारांशी नाळ पक्की राहते. तूर्तास इतकेच, 

धन्यवाद.