Thursday, January 11, 2018

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब !!!

स्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! 🙏🌹👏
या सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.
केवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले. 
म्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.
यापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची!!
या राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.
स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.
ही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची!
तुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते!
माँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.
तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.
आज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्याची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,
प्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,
प्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि
प्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी!
मला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺🌸🌼
🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹
🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏

Monday, January 1, 2018

भीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय ? वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो

उज्ज्वल इतिहातून प्रेरणा घेऊन तिचा सन्मान करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर दगडफेक हा नीच वृत्तीच्या जमावाचा भ्याड हल्ला आहे. पर-गावाहून आलेल्यांच्या गाड्या फोडण्याने क्षणिक दहशत माजत असेल, पण त्याने तुमच्या डोक्यातील मेंदूच्या आकाराचा अंदाज लागतो.
काल झालेली घटना ही महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी एक घटना आहे. ब्रिटिश असोत किंवा उशिराचे पेशवे. गुलाम समजून ज्या ज्या शाह्यांनी जनतेचा छळ केला त्या सगळ्या संपण्यात आनंदच आहे.
ब्रिटिशांच्या छळाचे नव्याने वर्णन करायची गरज नाही. या शेवट-शेवटच्या पेशव्यानीं जाती व्यस्थेच जे हीन स्वरूप जाचक नियम आणि अटी लादून दाखवून दिलं त्याला माफी नाही. पण तो इतिहास आहे. त्या चुकांवर पांघरून घालून तो काळ कसा चांगला होता याचं पुनर्लिखाण कुणी करत असेल किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती कुणी करत असेल तर ते स्वीकार्य नाही.
शिवाजी महाराजांचा काळ असो कि त्या नंतरची राज्याची व्यवस्था. ती उभीच अन्याया विरुद्ध होती. राजेशाही असली तरी, न्याय आणि समानता याचा अंमल कायम राहावा म्हणून पुरेपूर प्रयत्न झाले. पण तो ही इतिहासच. त्याचीही गनगुळी रोज उगाळण्यात अर्थ नाही.
त्या सगळ्याच इतिहासाला गोंजारत बसून, षंढपणे त्याचे गुणगान गाण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाचं पुढे काही होणार नाही; हे सांगण्यासाठी 'आजच्या हवालदिल आणि दुष्काळी' परिस्थितीचं उदाहरणही खूप झालं.
बाबासाहेबांनी या देशाला आणि सगळ्याच समाजांना जो शिक्षण आणि प्रगतीचा रस्ता दाखवला त्याला सोडून उगाच बोंब मारत अस्मितेचे राजकारण करून भरकटत जाणारा समाज एक दिवस गलीत-गात्र होईल.
हे वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो.