Monday, February 18, 2013

छत्रपती शिवाजी - एक अलौकिक, असामान्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्व !!!



१९ फेब्रुवारी - युगपुरुषाची ३८३ वी  जयंती.

सह्याद्रीच्या दऱ्या - खोऱ्यातून, रात्रीचा दिवस करून,  क्षणाचीही उसंत न  घेता या महाराष्ट्राच्या मातीसाठी, स्वराज्यासाठी लढणारा पराक्रमी योद्धा ! याच मराठी मातीतून ज्यांनी  एक एक मावळा जोडला आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले. स्वराज्यासाठी - गुलामगिरी मिटवण्यासाठी त्यांच्यातील स्वाभिमानाला कायम पेटते ठेवले.
शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून या राजाने स्वराज्य स्थापन केले, स्वातंत्र्य म्हणजे काय याची पहिली जाणीव आमच्या रयतेला याच  राजाने करून दिली.
हा स्वराज्य निर्मितीचा संघर्ष फार मोठा; अगदी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे संघर्षच !! सबंध आयुष्य स्वराज्य निर्मिती च्या कार्यामध्ये स्वतः कधी हि मखमली गालिच्यावर न झोपलेला, गड किल्ल्यांवर , उन्हा - पावसात , कडाक्याच्या थंडीत केवळ आणि केवळ घोडदौड.. हि घोडदौड स्वराज्य वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि  जास्तीत जास्त माणूस  जुलमी  सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीi.
राजे आपल्या याच मावळ मातीतील आपल्या रान गड्यान सोबत त्यांच्या प्रत्येक सुख - दुखामध्ये सामील होत, त्यांच्या मध्ये एक विलक्षण असे प्रेम आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. "शिवबा" या एका नावामध्ये एक अद्भुत अशी जादू होती कि तमाम मराठी माणूस एका आत्मविश्वासाने या नावामागे उभा राहू लागला. अति बलाढ्य आणि पराक्रमी शत्रू विरोधातही आपण दोन हात करू शकतो हि प्रेरणा त्यांच्या मध्ये निर्माण झाली. स्वराज्य तर निर्माण झाले पण ते प्रत्येकाला आपलेसे वाटावे म्हणून राजे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचे ! इतिहासात कधी हि न झालेली रयतेची कामे छत्रपतींच्या देखरेखीखाली पार पडली, स्वराज्य उभे राहू लागले, ते चौफेर वाढू लागले पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी म्हणजेच संभाजी राजांनी हेच स्वराज्य चौपट वाढवण्याचे काम केले.आजच्या या प्रसंगी या महान आणि जाणत्या राजाची क्षणाक्षणाला आठवण व्हावी याचे कारण म्हणजे आज आमचा हाच महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, पाण्यावाचून अक्ख गाव आणि गाव स्थलांतरीत होत आहे. शेकडो किलो मीटर केवळ ओसाड जमीन, जनावरांचे सांगाडे आणि कोरड्या पडलेल्या नद्या आणि नाले. हे भयंकर चित्र आहे महाराष्ट्रातील काही भागातले.
आज आपला देश बळीराजाच्या कृपेने अन्न धान्याच्या बाबतीत संपूर्ण आत्मनिर्भर आहे, कोट्यांनी धान्य  गोदामामध्ये पडून आहे परंतु स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा पिण्याच्या पाण्यासाठीचा भयंकर दुष्काळ ओढवला आहे. अजून उन्हाळा सुरु व्हायचा आहे आणि थेंब भर पाण्यासाठी महाराष्ट्र तहानलेला आहे, जिथे माणसांची सोय नाही तिथे पाण्या अभावी, चाऱ्या  अभावी जनावरांचे काय हाल! 
एकीकडे एवढी गंभीर परिस्थती असतांना दुसरीकडे आमची सबंध राजकीय व्यवस्था हि या प्रसंगाचेहि  राजकारण करायला मागे पुढे पाहत नाहीये, ज्या शिवरायांच्या नावाने हे लोक राज्य चालवतात त्यांच्याकडून निदान थोडातरी आदर्श यांनी घ्यायला हवा.
काळ फार कठीण आहे,  या मातीवर आलेले संकट उलटवून लावण्यासाठी आता आपल्यालाच उभे राहावे लागेल. ज्या शिवरायांनी हे स्वराज्य स्थापन केले त्या मातीचे येणाऱ्या प्रत्येक संकटापासून सरंक्षण करणे हे प्रत्येक शिवरायांना मानणाऱ्या शिवप्रेमींचे कर्तव्यच. महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम  महाराष्ट्र आणि इतर काही भागात पडलेल्या दुष्काळा बाबतीत काही तरी ठोस करण्याची आज आपण शपथ घेऊ. थेंबभर पाणी वापरतांना देखील आपल्या दुष्काळी भावंडांचा निदान विचार तरी आपण करू शकतो. पाण्याचा अतिशय जपून वापर करून याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो.
अगदी काल  पर्वाचा एक प्रसंग ; जालना जिल्ह्यातील लाडसावंगी या एका लहानश्या खेड्यातील एका शेत मजुराचा चिमुकला "अजय" या पाण्यासाठी टेंकर मागे धावतांना चाकाखाली चिरडून मारला गेला. आज गावागावा मध्ये हे भयाण चित्र दिसत आहे, पाण्यासाठी आमच्या बाया - बापड्या, लहान लेकरं, वयोवृद्ध नागरिक धावतांना दिसत आहेत, शहरातही काही वेगळी परिस्थती नाहीये.

आज माझ्या घरात व्यवस्थित पाणी येत आहे म्हणून मला काय त्याचे,  म्हणून या दुष्काळाकडे बघू नका ! आज दुष्काळ काही भागां पुरता मर्यादित आहे पण लवकरच याची झळ सबंध महाराष्ट्राला बसल्या शिवाय राहणार नाही.
ग्रामीण - शहरी भागातील अडल्या - नडल्या साठी आप आपल्या परीने होईल ती मदत करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम  आपल्या सर्वांना करत आहे.

छत्रपती शिवराय असंख्य संकटांना सामोरे गेले, त्यातून कित्येक वेळा बचावले ते केवळ आणि केवळ त्यांच्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या सोबतीने.

याच शिवरायांचे आपण सर्व मावळे ! आज महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाला एकत्रित पणे सामोरे जाऊ. या प्रसंगाला निभावून नेण्यासाठी काय करता येईल या साठी तुमची बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक ताकद गरजेची आहे.

तुमच्या काही संकल्पना असतील, कुठे काही गरज असल्याचे लक्षात आले असल्यास कृपया पुढे या, संपर्क करा. आम्ही आणि आमच्यासारखे अनेक तुमच्या तुमच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी उभे राहतील हा विश्वास आहे.

मराठी मातीच्या या जाणत्या राजाचे , एका दृष्ट्या युगपुरुषाचे हेच खरे स्मरण !!!!!

शिवरायांच्या चरणी आमचा मानाचा मुजरा !!!!!!

जय जिजाऊ  - जय शिवराय 

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम 
www.jijau.com 

(या संकटाचा सामना करण्यासाठी काय करता येईल या साठी हि तुम्ही तुमच्या काही संकल्पना सांगा. 

जिजाऊ.कॉम तर्फे या दुष्काळामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात  ग्रामीण भागातील कुठल्याही  मुलाच्या शिक्षणात खंड पडू नये, शिक्षणातून गळती होऊ नये  या साठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. शक्य होईल तेवढ्या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वह्यांचे आणि इतर काही शालेय साहित्य वाटप ई . उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे. अशाच प्रकारचे किवा काही इतर कार्यक्रम आपण आपल्या पातळीवर घ्यावेत असे तुम्हाला आवाहन. प्रसंग बाका  आहे, येणारा काळ कठीण आहे.  प्रत्येकाने जपून पाऊले उचलली तर याही संकटाला आम्ही शिवरायांचे मावळे उलथवून लाऊ अशी आम्हाला आशा आहे.)