Wednesday, November 14, 2018

मराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक ! कसं ? एक अँगल.

मराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक ! कसं ? एक अँगल. 

देशाच्या प्रगती माधे शासनाच्या धोरणांपेक्षाही जास्त सहभाग असतो तो व्यक्तींचा. देशात नवीन उद्योग उभारणे, ते चालवणे, ते चालवण्यात अगदी मजूर म्हणून सहभाग घेणे, वैद्यकीय सेवा देणे, छोटी छोटी दुकान उभारून रोजगार निर्माण करणे ते लोकांना सेवा देणे, हे सगळं व्यक्ती करता असतात. लोकांना ते सहज करता यावं म्हणून शासनाने व्यवस्था सांभाळायची असते आणि तशी धोरणे आणि नियम बनवायचे असतात.

पण बहुतांश वेळा या देशातच नव्हे तर जगात सगळीकडे धोरणांशिवाय क्रांतिकारी बदल झाले आणि आणि विकास झाला. अनेक वेळा  ध्येय वेड्या लोकांनी धोरणं विरोधात असतांनाही कशाची तमा न बाळगता जगाला दोन पावलं पुढं नेण्यासाठी प्रयत्न केले. पुढे शासकीय व्यवस्थेकडून अशांचा सत्कार झाला आणि मग त्यांनी केलं ते इतरांनी करावं म्हणून धोरणं बनली. तर संक्षेपात काय तर 'लोकं' आधी दोन पावलं पुढं जाऊन नवा रास्ता शोधतात आणि मग शासन मानून येतं. 

तर मुद्दा असा कि आरक्षणाच्या चर्चेत आज आपल्याला - 'देशाला आरक्षणापेक्षा नवीन रोजगाराची गरज आहे' - हे ऐकायला भेटते. मलाही तसंच वाटायचं. अगदी अर्ध्या तासापूर्वी पर्यंत. पण तसं नाहीये. आजवरच्या तुकड्या तुकडयांतील निरीक्षणांवरून एक लक्षात आलाय कि 'आरक्षण' आणि 'नवीन रोजगार' (फक्त 'रोजगार' नाही) हे एक विरुद्ध दुसरं असं नाहीये. म्हणजे आरक्षण आलं आणि ते समाजाच्या सगळ्या गरजू घटकांना आलं तर देशात नव्या रोजगाराचे निर्माते ते घटक असतील. नसता 'जुगाडावरच' आपल्याला समाधान मानावं लागेल. हे 'जगप्रसिद्ध भारतीय जुगाड' निर्माणते इतर कुणी नसून या सगळ्या उपेक्षित समाजातले घटक आहेत. हाताला पोटभर रोजगार नाही आणि नवं 'व्यवस्थित' (शिकलेल्यांच्या भाषेत 'सायंटिफिक इनोव्हेशन')  निर्माण करायला साधनं नाहीत, शिक्षण नाही आणि असेल तर संधी नाही. म्हणून छोट्या मोठ्या टीव्हीच्या बातमी पलीकडे आणि चार गावांच्या स्तुती पलीकडे त्यांना फार काही करता येत नाही. जर ही सगळी लोकं व्यवस्थित शिकली, त्यांना ते शिकण्याची 'संधी' मिळाली आणि ते शिकलेलं वापरायची 'संधी' मिळाली तर जुगाड न करता खरोखर त्यातनं जगाला दोन पावलं पुढे नेणारं सायंटिफिक इनोव्हेशन ते करू शकतील.  

आपल्या देशात जातवार 'कामं करणारांची' मोजणी केली तर त्यात बहुतांश पूर्वाश्रमीचा न शिकलेला बहुजन समाज आहे. इतरांबद्दल म्हणजे ब्राह्मणांबद्दल आणि इतर काही सवर्णांबद्दल  द्वेष बाळगण्याचा इथं मुळीच अर्थ नाही. पण, एकंदर आपल्या सामाज व्यवस्थेनेच याने हे करून नये आणि त्याने ते करून नये म्हणून बंधनं घालून लोकांना फक्त ठरवून दिलेली कामं करायला भाग पाडलं. त्यानं अनेकांना इतर स्वतःच्या सोडून इत्तर क्षेत्रात अगदी शतकानु शतके घुसता आलं नाही. आणि म्हणून मला वाटतं आपल्या देशात 

हे इंटर डिसिप्लिनरी असं काही नसल्याने लोक उपयोगी असं काही बनलं नाही. शिकलेले शेतीत आले नाहीत आणि शेतातील शिकले नाहीत म्हणून, नवं काळानुरूप शेतीत आलं नाही आणि शेतीची दुर्दशा आपण आता पाहतोच आहोत. हे एक उदाहरण. असं कितीक आणि कुठं कुठं आपण गमावलं असेल याची खरंच गणती नाही. 

या सगळ्याची परिणीती म्हणजे, गावागावात दारूच्या आणि गांजाच्या नादी लागणारी मिसरूड फ़ुटलेल्यांची फ़ौज. हीच फौज उद्या आपल्या सगळ्यांच्या मानेवर चाकू ठेवून उभी राहावी असं वाटत नसेल तर वेळीच 'चार शब्द लिहू शकणारांनी' आणि 'नियम-धोरणं बनवू शकणारांनी', 'मी' आणि 'माझी जात' सोडून प्रशांकडे बघावं. जे खरं ते माझं म्हणावं, जे माझं ते खरं नव्हे.

महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झाल्यास, मराठा समाजाकडे स्थावर भांडवल आहे, लोक समूह आहे आणि त्याला हाताळायचा शतकांचा अनुभव आहे. पण नाही ते शिक्षण आणि नौकरी. आणि यामुळे तुरळीक सोडल्यास बहुतांश समाज 'चलनाच्या तंगीत' जगतोय. होल्डींगला १०-२० एकर असणारांनाही ५०० रुपयांची भ्रांत आहे. तिथंच अगदी वर्ग ४ च्या नौकरदाराला ५०० रुपये म्हणजे फार फार तर एक-अर्धा दिवसाची पगार आहे.

कालच्या  दिवाळीला एस. टी.  ने प्रवास करतांना शेजारी बसलेल्या सुतार समाजातील एक व्यक्तीने सांगितलं  कि बहिणीकडे जातोय. त्या आल्या नाहीं का? असं विचारल्यास सांगितलं कि एकीला आणलं तर ३ हजाराच्या खाली खर्च होत नाही. तिची साडी, तिच्या दोन लेकरांना कपडे आणि इत्तर गोड-धोड किराणा पकडून कमीत कमी ३ हजार लागतात आणि मला अशा ३ बहिणी. ते अशक्य, म्हणून १००० रुपयात सगळी गावं फिरून यायची! असं त्यांचं गणित. भर दिवाळीत उशिरा पर्यंत काम करून थकलेले गृहस्थ मध्ये मध्ये डुलक्या देत होते. कामाबद्दल त्यांनीच सांगितलं. तर, मराठा समाजाच्या प्रश्नात सुतार समाजाला का आणलं ? असं वाटत असेल तर आपण हे समजून घेत नाहीत कि समाज हा विणलेल्या कपड्या सारखा आहे. थोडं उसवलं कि सगळंच उसवत जातं. तेच ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या सगळ्या समाजांच मराठा समाजाच्या दुरावस्थेमुले झालंय. मी तर ब्राम्हण समाजातील फक्त पूजेची कामं करावी म्हणून पुण्याला आलेल्या २-५ तरुणांची नावं ही सांगू शकतो. या सगळ्यांचं समाधान फक्त मराठा आरक्षणाने होईल असं ही नाही. पण, आरक्षण न मिळाल्यास किंवा त्या सारखं इतर काही परिणामकारक न मिळाल्यास हे उसवत चाललेलं समाजाचं वस्त्र त्याला नग्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते दृश्य कुणाच्याही डोळ्यांना बघवणार नाही हे हि खरं. 

आरक्षणाने टॅलेंटेड लोकांचं नुकसान होतं असं वाटणारांनी, याच सगळ्या टँलेन्टेड लोकांनी देशाच्या 'स्वतंत्र वर्षांच्या' आणि 'त्या पूर्वीच्या' प्रगतीत किती हातभार लावला? देशाला गरजेच्या स्पीड ने विकसित करावं म्हणून काय केलं ? आज देश ज्या गर्देत अडकलाय त्याला तिथवर येतांना रोखण्यासाठी काय केलंय ? आणि आणि अशा अनेक मुद्द्यांच मूल्य मापन करावं. आपल्या सभोवताली पाहिल्यास या सगळ्या अराजकाचे 'काही जनक' हे आपले टॅलेंटेड लोकचं आहेत. आणि हे जनक टॅलेंटेड अनेक जातीतील आहेत. सगळ्यांनाच अराजकाची जनक म्हंटल नाहीए, हे ही लक्षात घ्यावं. 'जे खरं ते माझं, जे माझं ते खरं नव्हे' या विचाराने याकडे पाहिल्यास लक्षात यायला वेळ लागणार नाही. 

असो. मुळात आरक्षण होतं म्हणून आज आपण डेमोग्राफिक डिवीडेंटच्या गप्पा मारू शकतोयेत. नसता तुरळीक लोकांच्या जीवावर, बहुसंख्यांना संध्या नाकारून आपल्याला आज गाड्यांनी फिरता आलं नसतं आणि हातात ५ इंचीचे मोबाईल ही धरता आले नसते!    

महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर निरपेक्षपणे, बहुतांश असलेल्या या समाजातील लोकांना आरक्षण देणं गरजेचं आहे. नसता या बहुतांशांना सोडून कसलीच प्रगती करता येणार नाही! 


Thursday, March 29, 2018

अशीही वॉलपेपर असावीत

अशीही वॉलपेपर असावीत. दरवेळी कुण्या इंग्रजी माणसांचे चेहरेच असावेत असं नाही :) कुणीही वापरू शकता

Wednesday, February 21, 2018

या पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत

> बाबासाहेबांनी संविधानाच्या संदर्भातच एकदा खूप मूल्यवान गोष्ट सांगितली होती. ती अशी - "प्रत्येक पिढीसाठी त्या त्या पिढीने नियम आणि संविधान ठरवावं. मागच्या पिढीने घातलेले नियम आणि त्यांचं अंधानुकरण करणं म्हणजे, जिवंत असणाऱ्या या पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत असं होईल." ते व्हायला नकोय. आणि नेमकं तेच आपण करतोय असं वाटतं. धर्म म्हणजे जगण्याचे नियम, जे बदलणाऱ्या माणसासोबत बदलत असतात. वेद. पुराण, स्मृती, मेलेल्या माणसांनी लिहलेली सगळी पुस्तकं आणि तितकच काय तर संविधान सुद्धा, आपल्या आजच्या जगण्याच्या कसोटीवर घासून बघितलं पाहिजे. खरं उतरलं तर वापरावं, नसता त्याला बदलायला हात धजायला नकोत. संविधानाच्या बाबतीत, आपण ते बदल वेळोवेळी करतोय, ही खरं तर आनंददायी बाब आणि म्हणूनच त्या काळच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे आपण असंख्य आभार मानायला हवेत.
> आरक्षण हे मुळीच गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. ते तुमचं व्यवस्थेत रिप्रेसेंटेशन असावं म्हणून आहे. हा त्याचा मूळ गाभा. आता फ्रेम केलेल्या कायद्याच्या ओळीत हा गाभा पकडता येणं कायदे मंडळाचं काम आणि कौशल्य. ते अशात प्रामाणिकपणे केले जात नाही असे दिसते. खरंतर आरक्षणाला आपण डेली फूड म्हणून न वापरता फक्त सप्लिमेंट म्हणून वापरयाला पाहिजे. योग्य तितकच आणि हवं तिथेच. नसता त्याचे साईड इफेक्ट इतके होतायेत की इथची समाज व्यवस्था ओबड धोबड गाठी-गाठींनी वाढलीये.
तर आरक्षण काही मूळ प्रश्न सोडवणार नाही. सरकारी नौकऱ्या कमी होणार आणि त्यांचं कंत्राटीकरण होणार या काळ्या दगडावरच्या दोन पांढऱ्या रेघा आहेत. सरकारी शिक्षण व्यस्था अगदीच ऑक्सिजनवर आहे. म्हणून आर्थिकभार काहीसा हलका, तो ही काही काळासाठीच, आरक्षणाने वाटेलही, पण तो काही दूरगामी उपाय नाही.
> खरं तर शेतीचा प्रश्न हा सगळ्यांचं मुळ आहे. ५ एकर मध्ये ५-१० लाखाचं उत्पादन झाल्यास कोण मारून घ्यायला ४-५ लाखाची नौकरी करेल. हा साधा सोपा विचार आहे. पण ती काही फायद्याची राहिली नाही, ठेवली नाही. आणि हे पुन्हा पुन्हा बोललं जातंय. शासनाच्याही डोक्यात तेच भरलंय - शेती काही फायद्याची होऊ शकत नाही. मुळात हा असला विचार शासन व्यस्थेने करणे आणि शेतीच्या प्रश्नांकडे, तिच्या फॉर्मच्या बदलाकडे दुर्लक्ष करणे हा निव्वळ आत्मघाती मूर्खपणा आहे. आणि हो, सब्सिडीवर चार लोखंडी नांगर देणे, फळबागांसाठी अनुदान देणे याला लक्ष देणे म्हणत नाहीत.
> दुसरं शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्याच्या क्वालिटीची लागलेली वाट. तसं हे इथेच नाही तर जभर सगळीकडे होतंय. पण अमेरिकेने यावर काही तरी उत्तर काढावं, मग केंद्र सरकाने कॉपी मारून करावं काही तरी आणि मग तुम्ही मी इथं महाराष्ट्रात काही तरी करू, याची वाट बघंन हा ही मूर्खपणाच आहे. वेळीच शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घातला तरच आपण उजेडात जगू शकू, नसता डोळे आले म्हणून दाखवायला गेल्यावर तुमचे माझे डोळे काढून विकल्या शिवाय डॉक्टरला त्याचे शैक्षणिक कर्ज फेडता येणार नाही.
> खरं तर अनेक प्रश्न आहेत, त्यांना सोडवणं सोप्प नाही, पण इच्छा शक्ती असल्यास, तितकंही अवघड नाही. फक्त जनतेला हे सगळं माझ्यासाठी चाललंय हे वाटायला हवं. बाप म्हणून शासनाचं लोकांवर प्रेम असेल तर, लोक मारही खाऊन घेतात. पण शासनच धर्मसत्तेचे सुपुत्र (औलाद) आहोत असे वाटून मेलेल्यानी लिहलेल्या गोष्टींच्या समर्थरणात उतरत असेल तर, जगणाऱ्यांना ते आपले वाटणे थोडे अवघड आहे.

Thursday, January 11, 2018

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब !!!

स्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! 🙏🌹👏
या सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.
केवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले. 
म्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.
यापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची!!
या राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.
स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.
ही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची!
तुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते!
माँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.
तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.
आज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्याची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,
प्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,
प्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि
प्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी!
मला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺🌸🌼
🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹
🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏

Monday, January 1, 2018

भीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय ? वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो

उज्ज्वल इतिहातून प्रेरणा घेऊन तिचा सन्मान करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर दगडफेक हा नीच वृत्तीच्या जमावाचा भ्याड हल्ला आहे. पर-गावाहून आलेल्यांच्या गाड्या फोडण्याने क्षणिक दहशत माजत असेल, पण त्याने तुमच्या डोक्यातील मेंदूच्या आकाराचा अंदाज लागतो.
काल झालेली घटना ही महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी एक घटना आहे. ब्रिटिश असोत किंवा उशिराचे पेशवे. गुलाम समजून ज्या ज्या शाह्यांनी जनतेचा छळ केला त्या सगळ्या संपण्यात आनंदच आहे.
ब्रिटिशांच्या छळाचे नव्याने वर्णन करायची गरज नाही. या शेवट-शेवटच्या पेशव्यानीं जाती व्यस्थेच जे हीन स्वरूप जाचक नियम आणि अटी लादून दाखवून दिलं त्याला माफी नाही. पण तो इतिहास आहे. त्या चुकांवर पांघरून घालून तो काळ कसा चांगला होता याचं पुनर्लिखाण कुणी करत असेल किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती कुणी करत असेल तर ते स्वीकार्य नाही.
शिवाजी महाराजांचा काळ असो कि त्या नंतरची राज्याची व्यवस्था. ती उभीच अन्याया विरुद्ध होती. राजेशाही असली तरी, न्याय आणि समानता याचा अंमल कायम राहावा म्हणून पुरेपूर प्रयत्न झाले. पण तो ही इतिहासच. त्याचीही गनगुळी रोज उगाळण्यात अर्थ नाही.
त्या सगळ्याच इतिहासाला गोंजारत बसून, षंढपणे त्याचे गुणगान गाण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाचं पुढे काही होणार नाही; हे सांगण्यासाठी 'आजच्या हवालदिल आणि दुष्काळी' परिस्थितीचं उदाहरणही खूप झालं.
बाबासाहेबांनी या देशाला आणि सगळ्याच समाजांना जो शिक्षण आणि प्रगतीचा रस्ता दाखवला त्याला सोडून उगाच बोंब मारत अस्मितेचे राजकारण करून भरकटत जाणारा समाज एक दिवस गलीत-गात्र होईल.
हे वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो.