Thursday, December 25, 2014

बाबा आमटेंच्या कविता

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव 
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
                        
---

वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्^थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेcया डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्^रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!
 
-----

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्^था निघाला
घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते
पांगळ्यांना पत्^थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती
त्यातुनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द रानी गर्जली आनंद द्वाही
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

----

पुराणांनी माणसांची उंची मापली 
तेव्हा हिमालय मोठा होता 
पण आता माणूस हिमालयाहून 
किमान साडेपाच फूट उंच झाला आहे! 

आणि कलियुगाचा धिक्कार करणार्‍या युगांनी 
ज्यातून कली शिरला ते धर्मराजाचे 
सडलेले बोटच तेवढे पाहिले होते 
आणि त्यांच्या घोडदौडीला 
अटकेवरच अटक बसली होती 
अटकेवर ज्यांचे घोडे थांबतात 
त्यांच्या पराक्रमाचे अखेर पानिपत होते 
भूतकालाच्या स्मृती आणि भविष्याच्या भीती 
यांनी ज्यांच्या मनात गर्दी केली होती 
वर्तमानातून वाट काढता येत नव्हती 
म्हणून जीवनाचा नकाशा ज्यांना समजला नव्हता 
आणि म्हणून भूतकाळाला जे माहीत नव्हते 
आणि भविष्य ज्याबद्दल मौन होते 
ते ज्यांना कळत नव्हते 
आणि त्या मौनातील कर्तृत्व साठवायला 
ज्यांच्याजवळ जागा नव्हती 
त्या धर्माच्या जो - जो गोळ्यांनी 
झापडलेल्या युगांना ज्याचे आकलन झाले नाही 
ते हे माझे कलियुग! 

ती युगे आपल्या प्राचीन प्रेतांचे पूजन करीत 
पळीपंचपात्रात सागराची आचमने देत बसली 
आणि जग कोठल्या कोठे निघून आले! 



त्यांचे लांड्या सोवळ्यातले अध्यात्म 
जीर्ण गंजलेल्या शिव धनुष्याचाच 
महिमा गात बसले 
पण शिवधनुष्याचा महिमा गाणारे 
ते उचलू शकत नाहीत 
आणि इतिहासात रेंगाळणारे 
इतिहास घडवू शकत नाहीत! 

माझे कलियुग आता त्या षड्दर्शनांच्या 
रेशमी गुंतावळी उलगडत बसणार नाही 
प्रत्यक्ष सत्यांच्या धारदार पात्यांनी 
त्या चराचरा कापीत ते जाईल 

कलियुगाला आरोपीच्या पिजर्‍यात 
ज्यांनी उभे केले 
त्यांनीच त्या पुरातन युगांचे कबुलीजबाब 
घेऊन ठेवले आहेत. 
सत्ययुगाने अमृत वाटताना 
असत्याशी केलेली तडजोड 
त्याला नाकारता येणार आहे काय? 
गुरुपत्नीशी संभोगापर्यंतची पापे करणारे ते युग 
त्याच्या शवावर शापाची क्षते अजून कायम आहेत 
गर्भवती पतिव्रतेचा परित्याग 
आणि शूद्राच्या साधनेचा शिरच्छेद करणार्‍या 
त्या त्रेता युगालाही त्रिवार वंदन असो! 

अर्धांगिनीचा जुगार खेळणारे 
आणि माणूस की हत्ती म्हणून वेळ मारुन नेणारे 
द्वापारातील त्या धर्मात्म्यांचे वारसदार 
अजून आपल्या भाकड गाईंचे 
रक्षण करीत बसले आहेत 
अरे, अशी कोणती पापे आहेत 
जी कलियुगाने केली 
आणि त्या युगात झाली नाहीत? 
असे कोणते दैन्य आहे जे कलियुगाने पाहिले 
पण त्या युगांनी भोगले नाही? 

अश्वमेधाच्या थंड वेदीत लोळलेला मुंगुस 
ती सारीच युगे तुडवीत आला नव्हता काय?
माझे कलियुग हे त्या उद्याच्या 'महामानवाचे सागरतीर' 
ज्याला धीरे धीरे जाग येत आहे 
विराटाची पाने कधी संपत नाहीत 
धुळीतील बाराखडी गिरवता गिरवताच 
ती पुरातन युगे उलथून पडली 
कलियुग आता आकाशाची पाने वाचू लागले आहे 
त्या पुरातन कल्पांच्या कल्पनेतही न मावलेले 

लक्ष लक्ष प्रकाशवर्षांच्या पलिकडल्या महाविस्तारापर्यंत 
त्याच्या दुर्बिणीचा डोळा जाऊन भिडला आहे 
आणि ते नासदियाचे आदिरहस्य 
त्याच्या प्रयोगशाळेच्या परीक्षणनळीत 
केव्हा तरी पकडले जाणार आहे 
शूद्रांच्या समूहांना मिठीत घेऊन 
कलियुग लिहीत आहे आता 'मनुष्यायन' 
आणि ते पहा लोहपंख्यांचे साहसी थवे 
आकाशाचे अग्निचुंबन घेण्यासाठी 
त्रेत्यातल्या वायुपुत्राहून उंच झेपावले आहेत 
अणूच्या घोड्यावर बसून 
आकाशगंगेला पालाण घालीत 
माझे कलियुग अटकेपार जाऊन पोचले आहे तेथे 
जेथे त्या तमाम प्राचीन युगांना प्रकाश देणारा सूर्य 
हा फक्त एक पिग्मी आहे!
   

Thursday, December 18, 2014

मराठवाडा दुष्काळ :- शेतकरी जगला तरच हा देश जगेल !!!



आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सहकार्य आणि गावातील शेतकर्‍यांना असल्या विचारांपासून दूर नेण्यासाठी समजतील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहिले पाहिजे. शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला आमचा सलाम.
या कामामध्ये प्रतींनिधिक स्वरुपात आम्ही असलो तरी अनेकांचे पाठबळ या कामाला असल्यामुळे हे शक्य होणार आहे.
मेडिया ने आपल्या छोट्याश्या प्रयत्नांची दाखल घेतली त्याबद्दल एबीपी माझा ( ABP Majha ) चे आम्ही आभार मानतो.

Tuesday, December 16, 2014

तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप

लोकसत्तेत आज कुणा मुर्खाने आपले भोकाड उघडले आणि "बळीराजाची बोगस बोंब" हा लेख लिहिलाय. बऱ्याच वेळेस काही घटनांचा नुसता निषेध व्यक्त करून काही होत नाही. अशा ठिकाणी दगडफेक आणि नैसर्गिक प्रकारे राग व्यक्त करणे ठीक असते. तरी कायद्याच्या भीतीने ते श्याक्या नाही. असो. भयंकर राग आलेला आहे.

लेखक नक्कीच शेती या व्यवसायापासून कोसो दूर असावा किवा त्याचे पोट शेती या व्यवसायावर कधीच आधारलेले नसेल. जगात जितके व्यवसाय आहेत त्या पैकी शेती हा सगळ्यात जुना. अन्न ही मुलभूत गरज म्हणून त्यावर आणि त्याच्या भावावर अनेक बंधने. तशी ती इतर अनेक व्यवसायात नाहीत. शेती कशी तोट्याची आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा अजून काही लिहायची गरज नाही. हजारो चालवली आणि अभ्यासकांनी ते केलेय. कुणाला ते वाचण्याची तसदी घ्यावीशी वाटली नसावी इतकेच.

अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातील सोने दिसते. ते शेतकरी नसतात. मुर्ख ते भूखंड किंग असतात. ते तुला नव्याने सांगायची गरज नाही. शेवटी तुझ्या सारख्याच्या हाती लेखणी म्हणजे दारू पिलेल्या माकडाच्या हाती आगकाडी. इतकेच हा लेख वाचल्यावर सुचले. कुणाला ही श्राप देवू नये असे म्हणतात. पण नापिकीने हैराण झालेल्या सगळ्या कुटुंबांकडून ज्याच्या परिस्थितीची आणि अश्रूंची तू बोंब म्हणून खिल्ली उडवलीस, त्या सगळ्यांकडून तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप!   

Tuesday, December 2, 2014

दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी

Need your Help!
----
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रोज येणाऱ्या बातम्यांनी मन अगदीच निराश होते. अगदी ५० हजारांच्या अडचणी मुळे जीव द्यावासा वाटणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाचे दुख इतक्या दूर राहून समजणे अशक्य. पण नक्कीच जीवन भयंकर असह्य झाल्या शिवाय कुणीच ती स्टेप घेत नसणार. ती असह्यत्ता आणि ते दुख: किती असेल हे त्रयस्थ हुवून समजले जाऊच शकत नाही.
मुला-बाळांनी भरलेला संवसार असा अर्ध्यावर तोही मागे पुढे काहीच ठेवून न जाता सोडून जाने ही अतिशय क्रूर गोष्ट आहे. आत्महत्या करणाराला यासाठी माफी नकोच. तो गुन्हेगारच असतो सबंध माणुसकीचा. पण कदाचित, चूक कळत असूनही टोकाचे पाऊल उचलणारा व्यवस्थेकडून इतका छळला गेलेला असावा की या जाणीवा हि त्याच्या बोथट झालेल्या असाव्यात.
पण आता सत्य स्वीकारावे लागणारच. मारणारे मेलेत. अर्ध्यावर सगळ टाकून मेलेत. मागे मुल-मुली आहेत. हिरमुसल्या चेहऱ्यांनी जग न्याहाळणारी आपल्या बापाला शोधत. तो भेटणार नाही हे सत्य.
अस म्हणतात दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी. पण त्यातही तुम्ही आम्ही ठरवलंच आणि अशा कठीण काळी घास वाटून खायचे ठरवले तर दुष्काळ आणि कठीण काटणे थोडे का होईना सुसह्य होते. म्हणूनच या सगळ्या परीस्थित आपण सगळे जे जे सुस्थितीत आहोत त्यांनी असा निश्चय करू की घरातल्या कर्त्याने आत्महत्या केलेल्या घरातील मुलांचे शिक्षण बंद पडू नये आणि अशा कठीण प्रसंगात कमीत कमी आता तरी काही काळ पैशाची चन-चन भाषु नये.
म्हणून यातल्या (किमान) ५० शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या पुढील वर्षापासून शिक्षणाची संपूर्ण मदत Kartavya: A Duty Towards Society आणि www.jijau.com मार्फत करणार आहोत.
पण सध्या त्यांच्या विधवा पत्नीला तातपुरता प्राथमिक हातभार म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- तत्काळ मदत करण्याचा विचार आम्ही करतोय.
हे तुमच्या मदतीनेच होणार आहेत. या वेळी अगदी हक्काने मगतोय. ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया Rs. 5000/- (or 100 USD) या कामी मदत करावी. ज्यांना मदत करतोयेत त्यांची नावे आणि इतर माहिती तुम्हाला काही दिवसात देऊच. तरीही २ (तारीख २० डिसे. २०१४ आधी) आठवड्यांच्या आत त्यांना ही मदत पोहचल्यास त्यांचा माणुसकीवरचा विश्वास कायम राहील.
For Account details: drop me an e-mail: pbpimpale@gmail.com