Sunday, November 18, 2012

एका वादळास अखेरचा सलाम ... !!!!


गेल्या ४५ वर्षांचा धगधगता झंजावात, एक राजकीय वादळ ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाची उलथापालथ  करून टाकली. वर्षानुवर्षे सरंजामशाही वृत्तीने निवडून येणाऱ्या पुढार्यांच्या ऐवजी अति सामान्य आणि ज्वलंत तरुणाला या राजकारणात आणि सत्ताकारणात महत्वाचे स्थान दिले. जाती-धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाने दगडालाही शेंदूर फासून देव बनविले, असंख्य शिव सैनिक, नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री घडवतांना स्वतः कुठल्याही पदाला - स्थानाला स्पर्श केला नाही जणू हे सर्व त्यांच्या पायाशी लोळण घालत होते.

राजकारणात राहून देखील सत्तेसाठी कधी हि तडजोड नाही किंवा एकदा टाकलेला शब्द पुन्हा माघारी नाही, एवढ्या सरळ आणि स्पष्ट वृत्तीचा बेधडक माणूस म्हणजे बाळ केशव ठाकरे. आपले बाळासाहेब ...

मरगळलेल्या समाजात अस्मितेची फुंकर घालून त्यांना ताठ मानेने जगायला शिकवणारे, प्रस्थापित - सरंजामशाही राजकीय व्यवस्थेला चांगल फोडून आणि झोडून काढणारे बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय - सामाजिक जीवनातील सदा लख - लखता  ध्रुव तारा.

वयाच्या ८६ व्या वर्षी हे वादळ शिवातीर्था वर काल शांत झाले. याच शिवतीर्थावर साहेब घडले, त्यांनी शिवसेना घडवली अनेक ऐतिहासिक सभा - आंदोलने याच मैदाने पहिली आणि शेवटी याच मैदानावर शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एका चीर निद्रेत गेला.

लाखो - लाखो लोकांनी या महाराष्ट्राच्या महानेत्यास शाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरातलाच एक व्यक्ती गेल्याचे दुखः सर्वांना झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्तब्ध राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

लाखो लोकांचे जीवन घडवणाऱ्या, शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी आम्हाला दाखवले अशा या महान - महान नेत्यास कोटी कोटी नमन .. आणि मनपूर्वक श्रद्धांजली.

बाळासाहेब .. अमर रहे  !

- अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे