Sunday, October 11, 2009

पहाट एका निर्माणाची ....

दोन एक दिवसांपूर्वी "nirmaan" च्या संकेतस्थळाला भेट दिली, पहिल्या भेटीतच निर्माण बद्दलचे आकर्षण वाटले.

"निर्माण" हि आशी एक चळवळ आहे कि ज्याच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला एक आव्हान केले गेले आहे, आपल्या स्वत्वाचा शोध घेणे म्हणजेच निर्माण. माझा जन्म का झाला ? माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे ? वैगेरे प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हास प्रवृत्त करणारी संस्था म्हणजेच "निर्माण".

निर्माण बद्दल नंतर कधी सविस्तर लिहिलाच कारण मी हि या साठी आगदी नवखा आहे.

या निर्माण च्या अधिक माहिती साठी मी मुंबई मधीलच श्री उमेश खाडे यांना फोन केला असता त्यांनी मला शनिवारी म्हणजेच १० ऑक्टो। ला दुपारी २ वाजता एका कार्यक्रमास येण्यास निमंत्रण दिले. मी आणि प्रकाश नि "निर्माण" च्या उत्सुकतेपोटी क्षणाचाही विचार न करता या कार्यक्रमास जाण्याचे ठरवले.

या निर्माण च्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.

या चर्चा सत्रामधे माननीय खोपडे सरांनी दोन विषयांवर
सविस्तर पने आपले अनुभव सादर केले.

त्यातील पहिला अनुभव किंवा एक असा प्रयोग ज्याची दखल केवल महाराष्ट्रानेच नाही तर सबंध भारत देशाने घेतली, तो म्हणजे त्यांनी राबवलेला अभिनव असा भिवंडीचा प्रयोग म्हणजेच "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना.
हा प्रयोग करतांना त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासाचा आणि केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती उपस्थितांना करून दिली, दंगलीची नेहमी सांगितली जाणारी कारणे त्यांनी खोडून काढली, आणि एका शास्त्र शुद्ध पद्धतीने दंगलीचे प्रमुख कारण शोधले, आणि एकदा का मुळ रोग काय आहे हे कळल्यावर उपाय करणे सोपे जाते म्हणतात न त्याच प्रमाणे त्यांनी या समस्ये साठी अतिशय रामबन उपाय सुचविले,हिंदू-मुस्लीम ह्यांच्या मध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, एकमेकांबाबत असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात या साठी मोहल्ला कमिटी च्या माध्यमातून त्यांनी अथक प्रयत्न केले.
भिवंडी देशातील अति संवेदनशील शहर, इथे स्वातंत्र्यानंतर भयानक स्वरूपाच्या ४ दंगली झाल्या , पण बाबरी मस्जिद तोडल्यानंतर देश भर उसळलेल्या भीषण दंगली मध्ये हेच भिवंडी शहर मात्र शांत होते, कारण माननीय खोपडे सरांनी अतिशय कठोर पाने राबवलेली "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना. या मुळेहजारो जीव तर वाचलेच पण समाजामध्ये एक चांगले वातावरण कायन राखण्यात त्यांनी यश मिळवले, आपण म्हणतो न एक माणूस काय करू शकतो, खोपडे सरांनी ते दाखवून दिले आहे कि एक माणूस सद्य व्यवस्थे मध्ये राहून सुद्धा खूप काही करू शकतो, गरज असते ती प्रखर इच्छाशक्तीची.

त्यांनीच राबवलेल्या दुसऱ्या योजनेची देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे सबंध पारधी समाजाकडे बघण्याचा जो कायम दृष्टीकोन झालेला आहे आणि त्या मुळे निरपराध पारधी समाजाला मिळणारी सापत्न वागणूक या मुळे त्यांनी "पारधी पुनर्वसन प्रकल्प योजना" राबविली.
या योजनेच्या माध्यमातून विविध नवी पाऊले उचलून गावकरी आणि पारधी वस्तीचे तांडे यांच्यातील विकोपाला जाणारे वाद संपुष्टात आणले गेले, विविध पारधी समाजातील लोकांचा चाललेला छळ त्यांनी थांबवला, पारधी समाजातीलच काही लोक पोलिसांचे मुखबीर बनले आणि होणारे गुन्हे आधीच आटोक्यात येण्यासाठी त्यांची मदत होऊ लागली. विविध नवीन पाऊले उचलून हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आणि त्या जिल्ह्यातील होणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी केले.

म्हणजेच आतिशय नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक संकल्पना त्यांनी नुसत्या मांडल्या नाहीत तर त्या त्यांनी यशस्वी करून दाखवल्या.

आपण नेहमी एका चौकटीची भाषा बोलतो,म्हणतो कि मला कसा हे जमेल .. मला या व्यवस्थेत राहून कस काय होईल ? पण या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे सुरेश खोपडे आणि त्यांनी त्याच चौकटीत राहून राबवलेले अभिनव उपक्रम.

या सर्व चर्चासत्र नंतर विविध प्रश्नांची सखोल उत्तरे सरांनी दिली, दत्ता भाऊंची मिश्कील उत्तरे देखील सोबतीला होती. अतिशय सुंदर असा संवाद चालला. प्रश्नांच्या फैरी आणि त्याला तेवढेच समाधानकारक उत्तर.

नक्कीच प्रत्येकाच्या मना मध्ये आपण हि काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि एक माणूस समाजातील अनेक प्रश्नांना कशी अभ्यासपूर्ण उत्तरे शोधू शकतो ह्याची पण प्रेरणा मिळाली. सामन्यातूनच असामान्य व्यक्तिमत्व उभे राहते इथे ह्याचा देखील प्रत्यय आला.

आपण नेहमी व्यवस्थेला दोष देत आसतोत, आणि बेह्मी एक प्रश्न आपल्या डोक्यात असतो कि
कोण बदलणार हे सगळ ?

सबंध चर्चे नंतर सर्व उपस्थित खालील काही प्रश्न स्वतः च्याच मनाशी बांधून घेऊन गेले असतील
If not you, Then who?

If not now, Then when ?

मला खात्री आहे खोपडे सरांच्या कार्यापसून प्रेरणा घेउन नक्कीच ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सर्व युवा वर्ग प्रयत्न करील .

या कार्यक्रमाच्या निमित्त्याने खूप चांगल्या लोकांची भेट झाली, विविध क्षेत्रातील तरुण - तरुणी वेगवेगळ्या विचारांनी भारलेली, पण एक सामाजिक बांधिलकी असणारी.

एका वैचारिक बैठकीची गरज सर्वांनाच हवी असते, निर्माण च्या माध्यमातून हि संधी सर्वांना प्राप्त झाली त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विचारांची सुरु झालेली हि चळवळ नक्कीच येणाऱ्या काळात एका नवीन निर्माणाची पहाट आणल्या शिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे.

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा,

http://nirman.mkcl.org/

http://sureshkhopade.com/index.html

लवकरच अधिक माहिती आणि नवीन उपक्रमांबद्दल माहिती घेऊन येईलच, तो पर्यंत

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

No comments:

Post a Comment