Monday, June 25, 2012

राजश्री शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

इतिहासातील असे एक अद्भुत व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्याने आणि विचारांनी हि मायभूमी लक्ख उजळून निघाली, छत्रपती शिवरायांचा खरा खुरा वारसा पुढे चालवणारे, समाजातील शेकडो वर्षांच्या अन्याय, अत्याचारांविरुद्ध लढा उभारणारे आणि या देशातील सामान्य रयतेला खऱ्या लोकशाही स्वातंत्र्याची पहिली ओळख करून देणारे, लोकांचे राजे... राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती.

हजारो वर्षांपासून खोलवर चिखलात रुतलेले, अडकलेले सामाजिक क्रांतीचे चाक ज्यांनी फिरवले, दबलेल्या, मागासलेल्या समाजाला राजाश्रय देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे राजश्री.
सामान्य रायातेसाठी शिक्षणाची, रोजगाराची दारे खुली करून समाजाला उभारी देण्याचे काम ज्यांनी केले. सामान्य रयतेच्या ताटातली भाकरी खाऊन त्यांच्यात मिसळून असामान्य व्यक्तिमत्व लाभलेला हा खरा खुरा राजा.

या माझ्या राजाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री परिवारातर्फे खरा खुरा मनाचा मुजरा.

जय महाराष्ट्र

व्हिडियो साठी आभार . - स्टार माझा अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Sunday, June 17, 2012

राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ साहेब पुण्यतिथी.


[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४]

स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू.
स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग. 
                                         
त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते. 
                                            
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचायला लागला.

राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.
आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन. 
       
जय जिजाऊ.


आपलेच,
कार्यकर्ते, जिजाऊ.कॉम

www.jijau.com

Monday, June 11, 2012

पाऊले चालती पंढरीची वाट !!!


जगत गुरु संत तुकाराम महाराज पालखी (देहू), संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी) आणि अश्या अनेक हजारो पालख्यांमध्ये सामील झालेल्या तमाम वारकऱ्यांना आमचा प्रणाम !
सबंध समाजाला एकत्र बांधून ठेवणारा, अठरापगड जातीतील लोकांना जीवन जगण्याचा सोप्पा मंत्र देणाऱ्या भागवत धर्माचा पताका आपल्या खांद्यावर घेऊन निघालेली हि वारकरी मंडळी .. त्यांच्या पायी हे मस्तक त्रिवार वंदन.

बोला ग्यानबा - तुकाराम.. पंढरीनाथ महाराज कि जय.. टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन कीर्तन करीत, डोक्यांवर तुळशी वृंदावन घेऊन.. पाऊले चालली आपल्या पांडुरंगाच्या भेटीला.

भक्तीचा एक अद्भुत सोहळा .. आयुष्यात प्रत्येकानं अनुभवावा असा सोहळा.
- मुख्यमंत्री

Thursday, June 7, 2012

कित्ती तोडणार शिवरायांना ?

शिवराय. सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांती सूर्य ! या मराठी मातीचा अखंड प्रेरणा स्त्रोत !

पण ह्या सूर्याला हि ग्रहण लावण्याचे काम गेले काही दिवस याच मातीमध्ये होतांना दिसते आहे.  शिवाजी महाराज किंवा त्यांचा इतिहास आला म्हणजे वाद हा आलाच हे काही आता या महाराष्ट्राला नवीन नाही , ज्या युगपुरुषाची कीर्ती आणि मूर्ती आम्ही सतत डोळ्यासमोर ठेवली पाहिजे त्यांचे नाव घेताच आज आठवण - उजळणी  होते ती त्यांच्याबद्दलच्या विविध वाद - विवादांची. बर हे वाद - विवाद निर्माण करणारे म्हणजे कोल्ह्या - कुत्र्यांच्या औलादीच ! लचके तोडून खाणे आणि पळून जाने हाच यांचा धंदा. पण आज माझा सवाल आहे कित्ती लचके तोडणार या महाराष्ट्राच्या आराध्याचे ! ज्याने सबंध अठरापगड जातींना एकत्र बांधून, खांद्याला खांदा लाऊन, उभा आयुष्य स्वराज्य निर्मितीसाठी खर्ची घातलं आज त्यालाच प्रत्येक जन टोळी टोळीने वाटून घेत आहे, ऐकायला आवडणार नाही पण हे सत्य आहे, आमच्या मातीचा आमचा पहिला वाहिला छत्रपती आम्ही वेगवेगळ्या गटा - तटांमध्ये वाटून टाकला.

तिथी वाल्यांचा एक गट ! तारखे वाल्यांचा एक गट !... ब्राम्हणांचा शिवाजी कुठे मराठ्यांचा शिवाजी ! बहुजनांचा शिवाजी .. तर कुठे आर एस एस वाल्यांचा शिवाजी .. एका शिवाजीचे एवढे तुकडे. खरतर शिवराय हे इतिहासातील एक निर्विवाद व्यक्तिमत्व आहे कि ज्याची दखल सबंध जगणे घेतली, सर्वांनी मानावे असे ते व्यक्तिमत्व पण आम्ही त्यांचे काय केले?

सर्वप्रथम तर आम्ही ह्या बहुआयाम्ही आणि धुरंदर व्यक्तिमत्वाला दैवत्व देऊन त्यांच्यातील असामान्य गुणांना झाकण्याचा प्रयत्न केला, शिवराय आणि त्यांचे विचार डोक्यात घालवण्या ऐवजी त्यांना फ़क़्त डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या टोळ्या निर्माण करण्यात आल्या ! मला नेहमी प्रश्न पडतो.. शिवराय देवाचे अवतार होते का ? नक्कीच नाही... ते आपल्या सारखेच हाडामासाचे पण एक अद्भुत व्यक्तिमत्व. मग त्यांच्या जयंत्या - पुण्यतिथी - राज्याभिषेक सोहळे हे पंचांग पाहून का बरं?
जो राजा  उभे  आयुष्य कुठल्याही वेळेची - काळाची तमा न बाळगता केवळ आणि केवळ लढत राहिला.. तुमच्या आमच्या साठी.. या मातीसाठी ! त्यांचे  सोहळे - त्यांची आठवण आज आम्ही पंचांग पाहून करणार आहोत का ? बर हे पंचांग वाले .. वर्षातील उरलेले सर्व दिवस इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे चालणार.. ह्यांच्या शाळा.. सुट्ट्या.. कार्यालये.. हे सर्व तारखेनुसार ह्यांना चालते,  ३१ डिसेंबर सुद्धा चालतो. फ्रेन्डशिप डे चालतो, व्हैलेनटायीन डे चालतो ! पण शिवरायांच्या बाबतीत ह्यांचे नीती नियम वेगळे.

बर सबंध भारतातील इतर सर्व महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी हि तारखेनुसार होते, आज २ ऑक्टोबर ला काय असते हे सांगायची गरज नाही, १४ एप्रिल ला काय असते हे सांगायला कुण्या विद्वान पंडिताची गरज लागत नाही..  मग असे असतांना केवळ शिवरायांच्या बाबतीतच असे का ?

सरकारी पातळीवर हा प्रश्न सोडवला गेला.. पण राजकीय आणि सामाजिक पातळीवर हा प्रश्न फार मोठे स्वरूप घेऊन उभा आहे.

एका सामान्य माणसाला.. जो शिवरायांना त्याच्या मनापासून मानतो, त्यांच्या पासून प्रेरणा घेतो आज त्याला निट कळत नाही कि कधी या महापुरुषाचे मी स्मरण करू.. कधी त्यांना आदरांजली अर्पण करू.. कधी माझा राजा छत्रपती झाला तो सोहळा साजरा करू? तिथीने करू कि तारखेने ? मग तिथी वाले कोण आणि तारखे वाले कोण ? दोघांची विचारसरणी काय ? मी कुणाच्या सोबत उभा राहू.. ? त्यांचे वाद.. ?  राहू द्या .. जाऊ द्या  !!! म्हणजे सुरुवातीला शिवरायांचा विचार डोक्यात असणार्याचा शेवट हा असल्या विचारांनी होतो.. हे फार - फार भयावह आहे. इतिहासनी दिलेला हा अजरामर ठेवा आम्ही आमच्या हातांनी संपवतोय. का देतोय मुठभर टोळक्यांच्या हाती या मातीचा बहुमोल मुकुट मनी ?

महाराजांना मानणार्यांनो एकत्रित पणे उभे राहा, पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेली हि एक अनमोल शिदोरी आहे.. ती नष्ट होण्या अगोदर जागे व्हा.

का नाही आपण त्या राजाच्या नावे एकत्रित पणे उभे राहू शकत .. दुभंगलेली जनता पाहून तो सह्याद्री सारखा कणखर राजा हि आज अश्रू ढाळत असेल.. परकीयांशी तर ते लढले, पण स्वकीयांनीच घात केला असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका.. खरच ती वेळ येऊ देऊ नका.

शिवरायांची जयंती, पुण्यतिथी किंवा शिव राज्यभिषेक दिन हा सद्य परिस्थती मध्ये दोन - दोन वेळा साजरे केले जातात, यामुळे निर्माण होणारा संभ्रम, शंका, आणि समाजमनातील दुही हे सर्वच खऱ्या शिव भक्तासाठी प्रचंड  वेदनादायक आहे. याच वेदनेने सर्वांना विनंती करीत आहे कि सबंध मानवजातीला आदर्श असणारे हे व्यक्तिमत्व जगभर न्यायचे असेल, मऱ्हाटी मुलुखाचा खरा स्वातंत्र्य दिन जगभर साजरा करायचा असेल तर आपण सर्वांनी  शिवरायांचे सर्व ऐतिहासिक क्षण  हे कुठल्याही वादाविना तारखे प्रमाणे एकत्र येऊन साजरे करावेत.


जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ .. जय शिवराय

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Tuesday, June 5, 2012

शिवराज्याभिषेक



शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Sunday, May 27, 2012

ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य


नव्या शैक्षणिक वर्षात काही ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा मानस आहे. काही आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यास माहिती द्या
आपल्याशी संपर्क करण्यात येईल.
For more Information please visit : http://jijau.com/?q=node/48

बेगडी चाळवली वाल्यांना विनंती


मित्रहो, कुणी ही कुणाच्या धार्मिक भावना दुखवू नये. जाती विरहित समाज निर्मिती हे आपण सर्वांच एक उदिष्ट आहे. कुणा एका जातीला टार्गेट करून जातीवाद जाणार नसतो आणि जाणार ही नाही. आता कुणाला काय कंटेंट टाकू द्यायचे आणि काय नाही यावर बंधन घालणे मला व्यक्तिगत पटत नाही. कुणाचे काही विचार असतील तर त्या विचारांना विचारांनी उत्तर देऊन किंवा त्याच पद्धतीने उत्तर देवून त्याचा विचार बदलण्याचा प्रयातना करावा, किंवा मग कुणी झोपेचे सोंग घेतल्यास मग त्याकडे दुर्लक्षच करावे. पण एकाद्या राग प्रश्न विचारू नका आणि मांडू नका असा म्हणून कधीच शांत होणार नसतो. तो आज नाही तर उद्या आणि इथे नाही तर अजून कुठे बाहेर पडणारच आहे. तरी एक स्पष्ट करतो जिजाऊ.कॉम हे कुण्या ही जातीय वा धार्मिक संघटनेशी संबंधित नसून, कुण्याही जातीचा द्वेष करणे वा कुण्याही धर्माचा द्वेष करणे या यास लाजीवनी बाबा मानते. अजून थोडा स्पष्टच बोलतो. सध्या काही एका विशिष्ट जातीला. जाऊद्या ना सरळच बोलतो, ब्राम्हणांना शिव्या घालण्यात अग्रेसर म्हणजे काही मराठे आहेत. नीट पहिला तर एकेकाळी ब्राम्हण जातीव्यवस्थेचे मार्गदर्शक होते आणि त्याच व्यवस्थेचे संरक्षक महाराष्ट्रात मराठे होते. आजही जातीय तंट्यात गोर गरिबांची घरे जाळण्यात आणि त्यांच्या लेकी बळींना अपमानित करण्यात महराष्ट्रात तरी अग्रेसर मराठेच आहेत. ज्या प्रकारे आरएसएस १०० ठीक चांगले काम करेल पण एकाद्या गावात जावून दलितांना मंदिरात प्रवेश करवून द्यावा (काढ्याने तो कधीच दिलेला आहे, पण समाजाने दिल्या का नाही ते बघा एकदा) किंवा त्या पेक्षा ही चांगले ग्राम व्यवस्थेत त्यांना मनाची पदे देवून अंतर जातीय विवाहाची चळवळ निर्माण करावी. ते नाहीच जमले तर कमीत कमी कधी जातीय भांडणे झालीच एकाद्या गावात तर गायब तरी राहू नये, असे कधी ही करत नाही. कमीत कमी मला किंवा माझ्या अनेक मित्रांना तरी दिसलेली नाही. तसेच या नव्या जातीय संघटनांचे. अनेक ठिकाणी मराठा समाजातील लोक जातोय द्वेषातून भांडणे करतात आणि तिथे या संघटना पब्लिकली समजवून सांगायला कधी जाणार नाहीत किंवा जात ही नाहीत. जातीविरहित समाज फक्त पुस्तकात सांगून तयार होताच नसतो आणि होणार ही नाही.
त्यामुळे बेगडी जातीय विरहित समाजाचे नेतृत्व आहोत असे दाखवून पुन्हा नव्या पाटीलक्या आणि देशमुख्या बळकावण्या पलीकडे अनेकांच इतर काही उदेश्य दिसत नाही. अशा हे बेगडी चाळवली वाल्यांना कळकळीची विनंती राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी किंवा मग संभाजी महाराजाच्या नावाने तरी ही सगळी कामे करून नयेत. बाकी समाज सुज्ञ आहे.
जय जिजाऊ!
www.jijau.com

 
  

Wednesday, May 16, 2012

प्रत्येकाने पहावा असा एक चित्रपट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Tuesday, May 15, 2012

विधानसभा : काऊन्ट डाऊन सुरु करा

आजकाल नेते फारच पूजले जातायेत. नेत्यांची शेंबडी पोर पण 'साहेब' म्हणून बोलावली जातायेत. मोफतच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मग पुन्हा समाजच्या आणि नागरिकांच्या मानगुटीवर बसायला तयार. आणि 'झंड' समाज सगळच 'झंड' असून असल्या 'घमंडी' नेत्यांच्या मागे उभा राहतो किंवा मग घरी तरी झोपतो, आप आपापल्या नेचर प्रमाणे खाली किंवा वर. मग पुन्हा पुढली काही वर्षे त्यांच्या समोर मना खाली घालून चालणे आलेच, ते ही स्वतःच्या चुकीमुळे म्हणा किंवा मग हलगर्जी पणामुळे म्हणा. 
इथून पुढे अस नको असेल तर येणाऱ्या निवडणुकात लायक, प्रामाणिक आणि स्वच्छ लोकांनाच निवडून द्या. आत्ता पासूनच शोधायल लागा आशी लोक अपक्ष, पक्ष कशी ही चालतील. प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नेत्यांची धुनी-भांडी आणि चाटाया उचलायचा सोडून बंडाचे बिनधास्त निशाण उचलावे. या वेळेस जनता नक्कीच पाठीशी उभी राहील. कुणाला मदत लागल्यास मुख्यमंत्री.कॉम सदैव तयार आहे मदतीला.  
काऊन्ट डाऊन सुरु करा!
जय जिजाऊ. जय शिवराय.
जय महाराष्ट्र!

[मुख्यमंत्री.कॉम ला प्रामाणिक नेत्यांबद्दल/कार्यकर्त्यांन बद्दल छापायला आवडेल]

संसदीय लोकशाहीची वाटचाल

संसदेच्या ६० वर्षांच्या इतिहासाचे सिंहावलोकन १३ मे रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात झाले. भारतात लोकशाही रुजली हीच ६० वर्षांतील मोठी उपलब्धी आहे, असे यावेळी सर्व वक्त्यांनी सांगितले. पण कारभाराची गुणवत्ता घसरलेली आहे. हे असेच होईल, असे भाकीत खुद्द पंडित नेहरू यांनी केले होते. दुर्दैवाने ते खरे ठरले.. भारतात लोकशाही टिकली, लोकांचे मूलभूत हक्क कायम राहिले, भारताची आर्थिक स्थितीही सुधारली, पण लोकशाही राज्य व्यवस्थेची गुणवत्ता सुधारली का? कार्यक्षम, गुणवान राज्य कारभार लोकांना मिळतो का? लोकांच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब संसदेच्या कारभारात पडते का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नाही, असेच द्यावे लागते. आश्चर्य याचे वाटते की भारतीय लोकशाहीची गुणवत्ता ढासळेल अशी शंका स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना व विचारवंतांना होती. काय होऊ शकते याचे भाकीत त्यांनी केले होते. पण तसे होऊ नये, म्हणून काय करावे हे त्यांना सांगता आले नाही वा खबरदारीही घेता आली नाही. ‘इकॉनॉमिक वीकली’च्या जुलै ५८च्या अंकातील ‘नेहरूंनंतर’ हा लेख गाजला होता. नेहरूंची कारकीर्द पूर्ण भरात असताना, बुद्धिवंतांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वावर त्यांचे अधिराज्य असताना नेहरूंनंतर काय होईल हे सांगण्याचा आगाऊपणा या लेखात करण्यात आला. लेखाचा लेखक अद्याप अनामिक राहिला आहे. मात्र तो द्रष्टा असावा. भारतीय लोकशाही कोणत्या मार्गाने जाईल याबद्दलचे त्याचे निदान अचूक म्हणावे असे आहे. तो म्हणतो..
‘टिळक, गांधी आणि नेहरू यांची वारसदार म्हणून काँग्रेसला मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे सुरुवातीच्या काही वर्षांत निरोगी विरोधी पक्ष तयारच होणार नाही. नंतरच्या काळात जेव्हा लोकांमध्ये नव्या पिढीतील नेत्यांबद्दल असंतोष वाढायला लागेल तेव्हा केवळ स्वसंरक्षणाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हे नेते जात, धर्म आणि प्रादेशिक हितसंबंधांच्या आधाराने मते मिळविण्याचा आणि शेवटी मतदानात गडबड करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसला पैशाचा मोह टाळणे कठीण होईल. मिश्र अर्थव्यवस्थेत व्यापारीकरण व समाजवाद यातील रेषा धूसर होतील. त्यामुळे शासनावर नियंत्रण ठेवणाऱ्याला चमकदार लाभ मिळत राहतील. व्यवसाय, उद्योग व नोकरवर्गाला हा लाभ मिळून पैशाचा लोभ वाढतच जाईल आणि आर्थिक हितसंबंध कार्यकर्त्यांवर कब्जा करतील. जातीय, धार्मिक व प्रादेशिक गटांमुळे प्रथम राज्यातील आणि मग केंद्रातील शासन यंत्रणा खिळखिळी होईल. प्रत्येक राजकीय पक्ष देशभक्ती सिद्ध करण्याच्या स्पर्धेत उतरेल. देश फुटण्याची चिंता व्यक्त करून काँग्रेस मते खेचून घेण्याची धडपड करील, तर जनसंघ (आजचा भाजप) पाकिस्तानची भीती दाखवेल आणि कम्युनिस्ट पक्ष अमेरिकी साम्राज्यवादाला होणाऱ्या विरोधाचा आधार घेईल..’
आपल्या आजच्या परिस्थितीचे इतके चपखल वर्णन अन्य कुठे मिळेल?
त्याआधी १९५७च्या जानेवारीत कोलकात्यात भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ एम एन श्रीनिवास म्हणाले, ‘जात हा कसा शक्तिशाली घटक बनला आहे याचे पुरावे सादर करतो. ब्रिटिश येण्यापूर्वी जातीला इतके महत्त्व नव्हते. प्रौढ मतदान व मागासवर्गीय गटांना संरक्षण दिल्यानंतर जातींची ताकद चांगलीच वाढली. वर्ग व जातीविरहित समाज निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट आहे, पण नेमके त्याविरुद्ध घडून जात हा प्रबळ घटक बनला आहे. जातीविरहित समाजनिर्मितीसाठी संविधान शपथबद्ध असले तरी जशीजशी राजकीय सत्ता जनतेच्या हातात जाण्यास प्रारंभ झाला तशी जातीजातीतील सत्ताकांक्षा व क्रियाशीलता वाढू लागली. जात हा सामाजिक क्रियाशीलतेचा प्रमुख घटक बनला’
दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी श्रीनिवासन यांनी हे भाषण केले. त्यावर तीव्र टीका झाली व भारतातील शहाणा मतदार जातीचे राजकारण झुगारून देईल, अशी ग्वाही सर्व वृत्तपत्रांनी दिली. परंतु, पुढील प्रत्येक निवडणुकीत श्रीनिवासनांची अटकळ खरी ठरत गेली.
खुद्द पंडित नेहरूंना काय वाटत होते? भारतात संसदीय लोकशाही स्थिर करण्याचे श्रेय नेहरूंच्या १८वर्षांच्या कारकीर्दीस जाते. altक्षमता व परिस्थितीची अनुकूलता असूनही हुकूमशहा होण्याचे कधी त्यांच्या मनातही आले नाही. उलट भारताला पुरोगामी वळण देणे व संसदीय संकेत रुजविणे याला त्यांनी प्राधान्य दिले. लोकसभेची पहिली निवडणूक ५२ साली झाली व त्यासाठी नेहरूंनी धुवाधार प्रचार केला. प्रचार सुरू असतानाच डिसेंबर ५१ मध्ये युनेस्कोच्या चर्चासत्रात, लोकशाहीच सर्वोत्तम शासन देऊ शकते हे मान्य करताना ते म्हणाले, ‘मात्र प्रौढ मतदानाच्या आधुनिक पद्धतीतून निवडल्या जाणाऱ्या प्रतिनिधींची गुणवत्ता हळूहळू घसरत जाते. त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता असते आणि प्रचाराचा आवाज प्रचंड असतो. मतदार त्या आवाजाला प्रतिसाद देतो. यातून एकतर हुकूमशहा निर्माण होतात वा निर्बुद्ध राजकारणी. असे राजकारणी कितीही दलदल माजली तरी तग धरतात आणि पुन्हा पुन्हा निवडून येतात. कारण बाकीचे खाली पडलेले असतात..’
भारतीय लोकशाहीची गुणवत्ता काय दर्जाची आहे, याचा वेध पहिल्याच प्रचारात नेहरूंना आला होता. षष्टय़ब्दीनिमित्त रविवारी झालेल्या विशेष अधिवेशनात अनेक सदस्यांनी सध्या खासदारांवर होत असलेल्या टीकेचा उल्लेख करून नाराजी प्रगट केली. मात्र लोकांनी टीका करावी अशी परिस्थिती येईल असे भाकीत नेहरूंनी लोकसभेच्या जन्माच्या वेळीच केले होते, याची आठवण कुणालाही नव्हती.
नेहरू हुकूमशहा झाले नाहीत. त्यांच्यासारखा बुद्धिवान व संवेदनशील नेता निर्बुद्ध राजकारणी होणे शक्यच नव्हते. तथापि, ७०नंतर काँग्रेसमध्ये, निर्बुद्धांची नसली तरी होयबांची फळी जोमदार होऊ लागली. हा काळ त्यांच्या कन्या इंदिरा गांधींचा होता. त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका नाही. काँग्रेसची नाळ त्यांनीच गरिबांशी जोडून दिली आणि बँकांच्या राष्ट्रीयीकरणासारखे अनेक निर्णय घेऊन काँग्रेसला स्थितीवादी होण्यापासून वाचविले. पाकिस्तानला पराभूत करून देशात आत्मविश्वास जागविला. मात्र त्यांच्याच काळात गुणवत्तेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला अतोनात महत्त्व आले. नेहरूंच्या कारभाराला तात्त्विक बैठक होती, व्यापक विचार होता. वैचारिक उलाढालींची कदर होती. इंदिरा गांधींच्या काळात संजय गांधींनी जमा केलेल्या फौजेला असा तात्त्विक पाया नव्हता. नीतिमत्तेबद्दल तिरस्कार होता. लोकशाही व्यवस्थेबद्दल असहिष्णुता होती. ‘इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पोलिटिकल वीकली’चे संपादक कृष्ण राज यांनी म्हटले होते की, ‘इंदिरा गांधींनी सूत्रे हाती घेतली तेव्हा काँग्रेस पक्ष सुसंघटित होता. अनेक पातळ्यांवरचे नेतृत्व देशभर विकसित झाले होते. ती पक्षयंत्रणा इंदिरा गांधींनी हेतूपूर्वक मोडून टाकली. गांधी कुटुंबीयांच्या आदेशानुसार जो वागत नाही, त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. बरोबरीचे सर्व नेतृत्व खलास केले. नवा पक्ष उभा केला असला तरी त्यामध्ये लोकशाही यंत्रणा नव्हती.’
रस्ता इथे चुकला.. त्याच बरोबर इंदिरा गांधींना या रस्त्याने चालण्यास अटकाव करण्यास जयप्रकाश नारायण यांची लोकनीती अयशस्वी ठरली. उलट देशाच्या दुर्दैवाने पुढील काळात प्रत्येक राजकीय पक्ष याच रस्त्याने चालू लागला. देशात लोकशाही टिकली, कारण त्यातून करीअर करायची संधी अनेकांना मिळाली. झटपट पैसा मिळविण्याचे ते उत्तम साधन झाले. राजकारणावर जगणाऱ्यांची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झाली. देशात लोकशाही टिकणे हे या अर्थव्यवस्थेला हवे आहे, कारण तो त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
अर्थात राष्ट्राच्या इतिहासात ६० वर्षे ही एखाद्या बिंदूप्रमाणे असतात. केवळ साठ वर्षांच्या अनुभवावरून देश अधोगतीला चालला आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. इतिहासातील एखादाच क्षण वा कालखंड पकडून त्यावर निष्कर्ष बेतणेही चुकीचे ठरते. प्रत्येक देशाच्या इतिहासात भारतासारखे कालखंड आले आहेत व त्यावर मात करून ते देश समृद्ध झाले आहेत. परंतु ६० वर्षांचा प्रवाह डोळसपणे पाहिला तर आपल्याला जागरूक होता येते. चुकीचा मार्ग सोडून नवे वळण घेता येते.
असे नवे वळण घेण्यासाठी लागणारी ऊर्जा तरुणांकडून येते. मात्र अलीकडे तरुणांमध्येच राजकारणाबद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झाला आहे. नेहरूंपासून राजीव गांधींच्या काळापर्यंत प्रत्येक दशकात, तरुणांची नवी पिढी जोमाने राजकारणात येत होती. प्रस्थापितांशी संघर्ष करीत कारभाराला वळण देण्याची धडपड करीत होती. त्यातील काही नंतर प्रस्थापित झाले, तर अन्य विरोधी पक्षांत विसावले. नवी अर्थनीती आल्यापासून मात्र तरुणांचा ओघ आटला. आज राजकारणात उतरणारे तरुण हे व्यावसायिक राजकारणी आहेत, मागील काळासारखे तात्त्विक राजकारणी नाहीत. दुसरा लोकनीतीचा पर्याय जयप्रकाशजींच्या निधनानंतर लुप्त झाला होता. आज अण्णा हजारेंकडे तो क्षीणसा दिसला तरी त्याला सुसंघटित तात्त्विक, वैचारिक पाया नाही. 
भारतात लोकशाही टिकली असली तरी कार्यक्षम, लोकांना सर्वागाने सक्षम करणाऱ्या कारभाराचे ध्येय अद्याप बरेच दूर आहे. ‘भारतात लोकशाही ही वरवरची नक्षी आहे’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाची यावेळी आठवण होते. मात्र ही नक्षी खोलवर रुजविणे आणि नेहरूंचे इशारे फोल ठरविणे ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे.
(सर्व प्रमुख अवतरणे ‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकातून)


सौजन्य : लोकसत्ता