Wednesday, December 29, 2010

सांस्कृतिक दहशतवाद आणि महाराष्ट्र !!!

जागतिकीकरणामुळे जग खूप जवळ आलंय..... पण माझ्या मते जग तर जवळ आलंय पण माणसे एकमेकांपासून वरचेवर दुरावली जात आहेत.

असाच आमच्या मध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून घडतांना दिसत आहे,

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कधीच योग्य नसतो ह्याचाच प्रत्यय काल परवाच्या घटनांवरून आला. साहित्य संमेलनाला एक चळवळीतला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून लाभला, उत्तम कांबळे. पारंपारिक पद्धतींना मोडून काढत त्यांने दिल खुलासपणे श्रोत्यांशी संवाद देखील साधला, खरोखरच उत्तम भाषण होते ते. पण लगेच दुसर्या दिवशी समजले कि साहित्य संमेलनातील एका स्मरणिके मध्ये नथुराम गोडसे चे महात्म्य सांगणारा एक लेख प्रसिद्ध झाला, भारताच्या या "महान?" गांधी द्वेष्ट्याचा किती दिवस असा उदो उदो करणार आहेत, ६० वर्षे झाली गांधींना मारून पण अजूनही हा द्वेष ! खरच खूप शरमेची बाब आहे जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राचा राष्ट्र प्रमुख या देशात येऊन सांगतो कि जर महात्मा गांधी झाले नसते तर कदाचित मी हि घडलो नसतो आणि त्यांच्या विचारांना कित्येक वेळा सलाम केला आणि आपण मराठी .. आपल्या मराठी साहित्य संमेलनात असल्या घोडचुका "जाणीवपूर्वक" करतोय, स्वतंत्र भारताच्या त्या कटू घटनांचे आता कित्ती उदात्तीकरण करणार, शेवटी माणूस मारणार पण त्याचे विचार कसे संपवता येऊ शकतात म्हणूनच मला वाटते हा आता सांस्कृतिक दहशतवादाचा पुन्हा एक प्रयत्न.

तशीच घटना पुण्यातली देखील, पण त्याचे राजकारणच जास्त झाले. राजकारण हे होणारच कारण तो मुद्दाच तसा भावनिक आणि आम्ही भारतीय, त्यातल्या त्यात मराठी आणि प्रश्न आमच्या आराध्य छत्रपती शिवरायांशी निगडीत .. मग हे राजकीय दुकानदार तरी कसे गप्प बसतील. पण ज्या शिवरायांचे हे नाव घेऊन सगळे राजकारण करीत आहेत त्यांना कदाचित माहित नाही कि छत्रपती शिवराय हे एक स्वयंप्रकाशित सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांच्या वर पहिला संस्कार घडवला तो राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी, माँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा। याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली। आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले।
सर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं च ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल। पुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने ।
या शिवरायांचे चरित्र घडण्यामध्ये बऱ्याच लोकांचा हातभार आहे, पण आज प्रत्येक जन असे दाखवण्याचा प्रयत्न करतोय कि शिवबा घडला तो आमच्या मुळेच ! मग त्यात कोण्या एकाचे उदात्तीकरण किंवा कोण्या एकाचा वयक्तिक उपहास, तिरस्कार हा ओघाने आलाच. खर तर कुठल्याही महापुरुषाला जाती - धर्मामध्ये बांधणे हे अयोग्यच ! माझ्या मते दादोजी कोंडदेव हे जरी शिवरायांचे गुरु नसले तरी हि ते इतिहासातील एक महापुरुषच ,
होय मी महापुरुष म्हणालो कारण त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात एका असामान्य अशा शिवबाच्या सहवासाचा पावन स्पर्श झाला, काही काळ त्यांना शिवबा सारख्या युगपुरुषाचा सहवास लाभला हे हि नसे थोडके, आणि त्या एका सामान्य माणसाचे जीवन देखील असामान्य बनले.

पण आज काही लोक जर शिवबाचे असाधारण व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये कुण्या एका साधारण पुरुषाचे नाव जोडत असतील तर ते हि अयोग्यच, आणि त्या साधारण पण शिवरायांचे सानिध्या लाभून असाधारण बनलेल्याचे अस्तित्वच जर कोणी नाकारणार असेल तर ती पण खूप मोठी चूकच.

पण आज एक समाज असा म्हणतो कि ते "गुरुच" होते आणि एक समाज म्हणतो त्यांचे अस्तित्वच आम्ही मान्य "करीतच" नाहीत .. दोघांचे हि मतप्रवाह खपले जातात.. दोघांच्या हि मागे आपला आंधळा समाज उभा राहतो ह्याला कारण म्हणजे इतिहासाच्या बाबतीत आपली असणारी उदासीनता. कोणी हि यावे आणि काही पण सांगावे आणि आम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवणार.. कारण काय तर आम्हाला इतिहासाचे ज्ञान तर नाहीच पण त्याची जान देखील राहिली नाही, म्हणूनच शिवरायांच्या, संभाजी राजांच्या इतिहासाची वेळोवेळी केलेली मोड-तोडही आमच्या लक्षात कधी आली नाही.

आपल्यातला हाच थंडपणा काही ठराविक लोकांचे हत्यार बनतो आहे, खुल्या दिलाने इतिहासावर चर्चा हि झालीच पाहिजे आणि आपण हि आपले कान आणि डोळे उघडे ठेवून ह्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण एकदा लिहिलेला इतिहास हा पुढच्या पिढीसाठी संस्कार म्हणून काम करीत असतो तेव्हा अशावेळी आपण गाफील राहता कामा नये, कारण अशाच प्रकारच्या मागच्या पिढीच्या काही गफलती आज आम्हाला अश्या जातीय संघर्षापर्यंत घेऊन आल्या आहे.

कोणी हि यावे आणि आमच्या भावनांचा खेळ करून त्याचा बाजार मांडावा एवढे काही आम्ही कमजोर असता कामा नये, अन्यथा असले वाद हे केवळ आपल्यामध्ये दुही निर्माण करतील बाकी काही नाही. एवढीच आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.

जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे

5 comments:

Mahendra said...

या विषयावर बरेच लेख वाचले पण सर्वारथाने बॅल्न्स्ड लेख तुमचाच वाटला. कुठेही अतीरंजीत किंवा एकांगी न होऊ देता लिहिलेआहे तुम्ही.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

धन्यवाद महेंद्र ! सध्या चालू असलेल्या परीस्थ्तीमध्ये आपण कुठल्याही एका अंगाने विचार करूच शकत नाही, तोच प्रामाणिक प्रयत्न इथे केला आहे.

चिमणराव said...

मित्रा, साहित्य संमेलनात नथूरामचे उदात्तीकरण वैगरे काही केले नव्हते, काहीही करून वाद उकरून काढायचा होता म्हणून हे निमित्त मिळाले.
आणि ओबामा गांधींबद्दल काय म्हणतात ते महत्वाचे नाही. आपण गांधींच्या विचारांचे काय केले हे महत्वाचे.
आपण त्यांचे स्वदेशी, ग्राम स्वराज्य हे सगळे विचार विसरलो, बाई आणि बाटलीत रमलो. आणि स्वताचे अवगुण झाकण्यासाठी सारखा गांधींच्या मारेकऱ्याला शिव्या देत असतो.
नथूरामने गांधी संपवले आणि कोंग्रेस ने गांधीविचार संपवले.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

चिमणराव.. ओबामांचा संदर्भ याच साठी दिला कि तुम्ही म्हणल्या प्रमाणे आंपण त्यांच्या विचारांचे काय केले हेच दाखवून दिले, आणि जे साहित्य संमेलनात घडले त्याचा मीच नाही तर समाजातील सर्वच स्तरातून निषेध झाला.

आणि तुम्ही म्हणाले हे हि तितकेच खरे.. गांधींना मारणारे आणि त्यांचे विचार संपवणारे दोघेही तेव्हडेच दोषी.. गांधींचे स्वदेशी, ग्रामस्वराज्य, श्रमदान वैगेरे विचार आमच्या समोर कधी येउच दिले नाहीत.. तशीच अपेक्षा खर तर साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमातून असते, जिथे आपल्या महापुरुषांचे विचार मांडण्याची आवश्यकता असते, आणि हे सोडून असले वाद निर्माण व्हावेत असे प्रयत्न जाणीवपूर्वक होतांना दिसत आहेत.

प्रकाश बा. पिंपळे said...

महेंद्र आणि चिमणराव. आपल्याला प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
चिमणराव एक वाक्य अगदी खर बोलले "नथूरामने गांधी संपवले आणि कोंग्रेस ने गांधीविचार संपवले", यात मी थोड मिळवेल- गांधी विचार संपवायल फक्त कॉंग्रेस नव्हे तर आपण सर्व भारतीयांचा सुद्धा हात आहे. बेगडी राजकारण्यांना मते देऊन आपण लोकशाही लयाला आणली. आणि ह्या "लय" प्रीक्रीयेला थांबवायला भाजप आणि सेना हि तितकीच असमर्थ ठरली. कारण त्यांच्याकडे प्रगतीचा आणि सर्व सामावेशाकातेच विचार नव्हता आणि अजून ही नाही! एकदा खरच चित्र रंगवून पहा सेनेने आणि भाजप ने काय गुल उडवले ते.
आरएसएस चे राष्ट्रानिर्मानाचे काम आणि विचार चांगले आहे, पण काही स्तरांवर जो गांधी द्वेष केला जातो तो अयोग्यच. ज्यांच्या विचारात अस्पृश्यता निर्मुलन आहे त्यांनी ते फक्त विचारातच ठेवले, कारण कदाचित ते करत असतांना विटाळ होईल असा संशय आला असावा. तरीही याला ही अपवाद आहे. आरएसएस ची खूप सारी कामे उल्लेखनीय आहेत, कितेय स्वयंसेवक आयुष्याचे रान करून राष्ट्र निर्माणाला झोकून देतात. पण काही कम नशिबी लोकांना ना आरएसएस कळली ना गांधी आणि भारत कळला. असो. माणुसकीच्या पक्काय्पायावर उभे असणारे हे राष्ट्र पुन्हा झेप घेईल यात शंका नाही. फक्त त्याला जोड असावी समजूतदार आणि संयमी प्रयत्नांची.
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा पर्याय नाही. पण बदला साठी कमीत कमी तयार तर होऊ. नसता शिवाजी महाराज आणि गांधी भारतातच राहतील आणि कदाचित त्यांचे विचार इतिहासात ही राहणार नाहीत.

Post a Comment