Sunday, March 11, 2012

पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)


                                           
                                                              यशवंतराव बळवंतराव चव्हाण
                                                          [१२ मार्च १९१३ - २५ नोव्हे. १९८४] 
उद्या पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती. तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन. 

या जन्म शताब्दी वर्षात यशवंतराव नव्या पिढी पर्यंत पोहोचावेत. राजकारणात हौशांची आणि पैशांची झालेली गर्दी कमी करायची असेल तर यशवंतराव डोक्यात ठेवून नव्या दमाच्या तरुणांनी राजकारण करायला हवे. ज्या सहकाराला हाताला धरून आजचा महाराष्ट्र यशवंतरावांनी उभा केला त्या सहकाराला पुन्हा स्फुरण देऊन, भ्रष्टाचार मुक्त करून सशक्त आणि आर्थिक संपन्नेतेचे माहेरघर महाराष्ट्राला बनवण्यासाठी सर्वांनी मुख्यतः तरुणांनी पुढे यायला हवे. भांडवलशाही स्वतःलाच गिळंकृत करत असतांना आणि समाजवाद भरकटत जात असतांना पुन्हा लोक सहभागाची, लोकांची लोकांसाठी आर्थिक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे. कदाचित तीच येणाऱ्या काळात आपली झोप न उडवता आपल्याला भरपेट खाऊन झोपू देईल. नसता अलिशान घरातील चिंतेने न आलेली भांडवलशाहीतील झोप किंवा मग रोजगाराच्या आभावातून उपाशीपोटी न आलेली भरकटलेल्या-भ्रष्ट-समाजावादातील झोप आपली भविष्यात वाट पाहतच आहे.

यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्षात काही संकल्प समोर ठेवायला हवेत. जसे 
१) समजूतदार, शिकलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या राजकारण्यांची निर्मिती 
२) ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन आणि मदत 
३) सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी नव्या पिढीवर तसे संस्कार
४) साहित्य, खेळ आणि माणूस म्हणून जगतांना लागणाऱ्या सर्व मुल्यांची नव्याने येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा ओळख
आणि अशा प्रकारचे मनुष्य जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम. मुख्यमंत्री कार्यकर्ता यशवंतरावंना आपल्या प्रेरणास्थानांन पैकी एक मुख्य प्रेरणास्थान मानते. येणाऱ्या पिढीला; नव्हे याच पिढीला यशवंतरावांसारखा राजकीय नेता झाला होता हे सांगितले तर खरच विश्वास ही बसणार नाही इतकी दुर्दैवी अवस्था आज राजकारणाची झाली आहे; आणि म्हणून चांगले लोक या पासून चार हात नव्हे तर चार-पाच किलोमीटर लांबच राहतात. पर्यायी चुकीची धोरणाने, भ्रष्ट व्यवस्था आणि जनतेचीच पुन्हा कुचंबना. याला मुख्य कारण म्हणजे  यशवंतरावांसारखे नेतृत्व दृष्टी आड करणे, ते न अभ्यासाने.

आज यशवंतराव आपण नव्या पिढीला शिकवूत. ते ज्यांना ज्यांना कळतील ती नक्कीच घडतील, राष्ट्राचा गाडा खंबीरपणे आणि गतीने चालवण्यासाठी. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येणारा एक ग्रामीण तरुण पुढे राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि उप-पंतप्रधान होतो; भारत-पाक युद्धात देशाची मान ताठ ठेवतो आणि सगळ्या सोबतच कविता, लेखक, शेतकरी, उद्योजक, कामगार आणि सामान्य माणूस यांच्यात सारखाच रमतो; हे चित्र आणि हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आणि खूप प्रेरक आहे. त्यांच्या या विचारांच्या मुशीतून या देशाचा तरुण गेला तर, आर्थिक तर होईलच पण माणुसकीची महासत्ता म्हणून अव्वल राहणे या राष्ट्राला सहजच शक्य होईल.

मुख्यमंत्री कार्यकर्ता याच विचारांशी आजपर्यंत बांधील आहेच, पण या वर्षी विशेष असे जमेल ते प्रयत्न करेल यशवंतराव जन्मशताब्दी सार्थक ठरवण्यासाठी. या पूर्ण जन्मशताब्दी वर्षात मुख्यमंत्रीच्या साइड बार मध्ये यशवंतराव असतील.
तुम्हा सर्वांना या जन्मशताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

--
नक्की वाचावीत अशी काही पुस्तके:
१. कृष्णा काठ - यशवंतराव चव्हाण : आत्मकथा
२. यशवंतराव चव्हाण, राष्ट्रीय व्यक्तीमत्व : यशवंतरावांच्या राजकीय, सामाजिक आणि काही अंशी व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकाणारे एक अतिशय चांगले असे संपादित पुस्तक

तसेच आमच्या वाचनात येणारी इतर पुस्तके ही येथे वाढवत राहू. आपण काही स्वतः वाचलेली पुस्तके सुचवू इच्छित असाल तर आपले स्वागतच आहे. 
तसेच या निमित्यांने यशवंतराव वा मग वरील ४ संकल्पावर आधारित आपले काही विचार असतील तर मुख्यमंत्री कार्यकर्ता ते छापण्यास उत्सुक आहे. आपले लिखाण येथे (ई-मेलपत्ता:amol.suroshe@gmail.com आणि ई-मेलपत्ता:pbpimpale@gmail.com) पाठवावे.
जय महाराष्ट्र!

जन्म शताब्दी वर्ष निमित्य:
१. काही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे
http://www.mukhyamantri.com/2012/08/blog-post_25.html

२. अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते
http://www.mukhyamantri.com/2012/08/blog-post_26.html

३. आरक्षण : अखंड देश अस्तित्वा साठी गरजेचेच
http://www.mukhyamantri.com/2012/09/blog-post_2172.html

४. यशवंतराव चव्हाण विचार मंच
 http://www.mukhyamantri.com/2012/12/blog-post_13.html

५. यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगता
http://www.mukhyamantri.com/2013/03/blog-post_12.html


No comments:

Post a Comment